Marathi News

आज गणेश चतुर्थी, लाडक्या बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ-मुहूर्त आणि पूजेचा योग्य विधी जाणून घ्या!

Written by:Rohit Shinde
Published:
आज गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर सर्वत्र आपले लाडके बाप्पा विराजमान होत आहेत. या पार्श्वभूमीवर प्रतिष्ठापना पद्धत, पूजा विधी आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या....
आज गणेश चतुर्थी, लाडक्या बाप्पाच्या प्रतिष्ठापनेचा शुभ-मुहूर्त आणि पूजेचा योग्य विधी जाणून घ्या!

आज अवघ्या देशभरात गणेश चतुर्थी मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. अवघ्या देशात तसा उत्साह पाहायला मिळत आहे. दरवर्षी गणेश चतुर्थीचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतो. भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. यंदा आज, बुधवार 27 ऑगस्ट रोजी गणेश चतुर्थी साजरी होत आहे. श्री गणेशाच्या सेवेत सर्वजण या काळात मग्न असतात. त्यादृष्टीने काही महत्वपूर्ण बाबी जाणून घेणे या ठिकाणी महत्वाचे ठरते. आपल्या लाडक्या बाप्प्याची स्थापना, पूजेचा विधी आणि शुभ-मुहूर्त जाणून घेऊयात…

गणेश चतुर्थी 2025: महत्वाचे मुहूर्त 

चतुर्थी तिथीची समाप्ती: 27 ऑगस्ट 2025, दुपारी 03:44 पर्यंत
मध्यान्ह गणेश पूजा मुहूर्त: 27 ऑगस्ट 2025, सकाळी 11:05 ते दुपारी 01:40 पर्यंत

गणेश चतुर्थीचे महत्व नेमके काय?

त्यामुळे आतापासूनच गणेश चतुर्थीची तयारी सुरू झाली आहे. हिंदू धर्मात गणेश चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. हा दिवस गणपती बाप्पाचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. सुख, समृद्धी आणि ज्ञानाचा देवता असलेल्या गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी हा दिवस अत्यंत शुभ मानला जातो. देशभरात गणेश चतुर्थीपासून 10 दिवस ‘गणेशोत्सव’ साजरा केला जातो. या उत्सवात घरोघरी गणपतीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करून आणि विविध धार्मिक विधी, मंत्रोच्चार आणि आरतीसह बाप्पांची पूजा केली जाते.

गणेश चतुर्थी हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा सण असून तो विघ्नहर्ता, बुद्धीचा देवता आणि मंगलकारी श्रीगणेशाच्या जन्मोत्सवाच्या निमित्ताने साजरा केला जातो. या दिवशी श्रीगणेशाची स्थापना करून भक्त मनोभावे पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करतात. गणेश हा प्रारंभी पूजला जाणारा देव मानला जातो, म्हणून प्रत्येक शुभ कार्याची सुरुवात गणेशपूजेनेच केली जाते. गणेश चतुर्थीमुळे भक्तांमध्ये एकात्मता, भक्तीभाव आणि उत्साह वाढतो. समाजात बंधुभाव, सद्भावना आणि एकोप्याचे वातावरण निर्माण होते.

पर्यावरणपूरक गणेशोत्सवामुळे निसर्गसंवर्धनाचाही संदेश दिला जातो. त्यामुळे गणेश चतुर्थी हा केवळ धार्मिकच नाही तर सामाजिक आणि सांस्कृतिक दृष्टिकोनातूनही अत्यंत महत्वाचा सण आहे.

पूजा आणि आरतीचे महत्व आणि पद्धत

वर्षातील 24 चतुर्थींपैकी भाद्रपद गणेश चतुर्थीला सर्वाधिक महत्त्व आहे. गणपतीच्या आगमनासाठी पूजा करण्यासाठी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि स्वच्छ कपडे परिधान करावे. लाल किंवा पिवळ्या रंगाचे कापड घेऊन एका लाकडी पाटावर अंथरावे आणि तो फुलांनी सजवावा. पाटावर गंगाजल शिंपडून गणपतीची मूर्ती स्थापित करावी. दिवा लावावा, गुलाल-कुंकवाचा टिळा लावावा. त्यानंतर गणपतीला वस्त्र, लाडू किंवा मोदक, पिवळी फुले, गोड पान, पान-सुपारी-लवंग आणि पाच प्रकारची फळे अर्पण करावीत.
“ओम गं गणपतये नमः” या मंत्राचा जप करून पूजेला सुरुवात करावी. गणेश आरती म्हणावी आणि विनायक कथा तसेच श्री गणेश स्तोत्राचे पठण करावे. गणपतीची आरती झाल्यानंतर बाप्पांना नैवद्य दाखवून प्रसाद वाटप करवा. काही भक्त गणपती बाप्पाच्या आगमनाचा आनंद साजरा करण्यासाठी घरात कीर्तन आणि भजन आयोजित करतात. एकंदरीत देशभरात चैतन्याने साजरा होणार असा हा सोहळा आहे. भक्तांमध्ये या काळात विशेष उत्साह असतो.

 

टीप : वरील सर्व माहिती उपलब्ध स्त्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल MP मराठी Breaking कोणताही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews