Marathi News

120 Bahadur Controversy : फरहान अख्तरचा ‘१२० बहादुर’ वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटावर यादव विरोध; काय आहे कारण?

Published:
हा चित्रपट १९६२ साली भारत आणि चीन यांच्यात लढल्या गेलेल्या रेजांग ला लढाईवर आधारित असून, त्यामध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा सादर करण्यात आली आहे. तथापि, हरियाणामधील यादव समाजाने या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत तीव्र विरोध दर्शवला आहे.
120 Bahadur Controversy : फरहान अख्तरचा ‘१२० बहादुर’ वादाच्या भोवऱ्यात, चित्रपटावर यादव  विरोध; काय आहे कारण?

चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता, निर्माता आणि दिग्दर्शक फरहान अख्तर यांच्या आगामी चित्रपट ‘१२० बहादुर’ संदर्भात वाद निर्माण (120 Bahadur Controversy) झाला आहे. हा चित्रपट १९६२ साली भारत आणि चीन यांच्यात लढल्या गेलेल्या रेजांग ला लढाईवर आधारित असून, त्यामध्ये भारतीय सैनिकांच्या शौर्याची गाथा सादर करण्यात आली आहे. परंतु, हरियाणामधील यादव समाजाने या चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेत तीव्र विरोध दर्शवला आहे.

चित्रपटाच्या शीर्षकात ‘अहीर’ शब्द समाविष्ट करावा 120 Bahadur Controversy

गुरुग्राम येथे मोठ्या संख्येने यादव समाजाचे लोक एकत्र जमले आणि त्यांनी ‘१२० बहादुर’ या चित्रपटाच्या नावावर नाराजी व्यक्त केली. त्यांच्या मते, रेजांग ला लढाईत लढलेले बहुतेक सैनिक यादव समाजातील अहीर समुदायाचे होते. त्यामुळे चित्रपटाच्या शीर्षकात ‘अहीर’ हा शब्द समाविष्ट करून ‘१२० बहादुर अहीर’ असे नाव ठेवावे, ही त्यांची ठाम मागणी आहे.  या मागणीसाठी समाजाने राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४८ वर आंदोलन केलं, ज्यामुळे वाहतूक ठप्प झाली. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली, मात्र आंदोलकांनी आपल्या मागण्यांवर ठाम राहण्याची भूमिका घेतली आहे.

आंदोलनकर्त्यांचे म्हणणं काय

यादव समाजाच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले की, त्यांचा सरकारविरोधात काहीही रोष नाही. मात्र, चित्रपटाच्या माध्यमातून (120 Bahadur Controversy) त्यांच्या समाजाच्या ऐतिहासिक योगदानाकडे दुर्लक्ष केलं जात असल्याची त्यांना खंत आहे. त्यांच्या मते, ही लढाई केवळ १२० बहादुर जवानांची कथा नसून, ती अहीर रेजिमेंटच्या जवानांची गौरवगाथा आहे. त्यामुळे ‘अहीर’ या ओळखीचा सन्मान राखणं गरजेचं आहे. एका आंदोलकाने म्हटलं, “आम्ही अहीर रेजिमेंटचे सदस्य आहोत. आमच्या पूर्वजांनी बलिदान दिलं. ‘१२० बहादुर’ असं नाव सामान्य वाटतं, पण ‘१२० वीर अहीर’ केल्यास ते ऐतिहासिकदृष्ट्या अचूक आणि आदरयुक्त ठरेल.”

प्रदर्शनकर्त्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर चित्रपटाच्या नावात अपेक्षित बदल करण्यात आला नाही, तर २६ ऑक्टोबर रोजी संपूर्ण देशभरात मोठं आंदोलन छेडलं जाईल. तेव्हा केवळ गुरुग्राम नाही तर देशातील अनेक ठिकाणी यादव समाजाचे सदस्य रस्त्यावर उतरतील, असा इशारा देण्यात आला आहे.

*चित्रपटाची पार्श्वभूमी : रेजांग ला लढाईतील शौर्यगाथा*

‘१२० बहादुर’ हा चित्रपट १९६२ साली लडाखमधील रेजांग ला या भागात भारत-चीन युद्धादरम्यान घडलेल्या ऐतिहासिक लढाईवर आधारित आहे. या लढाईत १२० भारतीय जवानांनी जवळपास ३,००० चिनी सैनिकांचा सामना केला होता. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लढून अनेक जवानांनी वीरमरण पत्करलं. या लढाईला भारतीय लष्कराच्या इतिहासात एक अजरामर स्थान आहे. चित्रपटात फरहान अख्तर हे मेजर शैतान सिंह भाटी यांची भूमिका साकारत आहेत. मेजर भाटींनी जखमी अवस्थेत असूनही माघार घेण्यास नकार दिला आणि शेवटच्या श्वासापर्यंत शत्रूशी लढा दिला. त्यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या बहुसंख्य सैनिकांचे मूळ हरियाणामधील रेवाडी जिल्ह्यात होते आणि ते यादव समाजातील अहीर समुदायाचे सदस्य होते, असं ऐतिहासिक नोंदींमधून समोर आलं आहे

चित्रपटाच्या निर्मात्यांची भूमिका अद्याप अस्पष्ट

फरहान अख्तर किंवा चित्रपटाच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया (120 Bahadur Controversy) देण्यात आलेली नाही. चित्रपटाच्या शीर्षकात कोणताही बदल करण्यात येणार आहे का, याबाबतही स्पष्टीकरण आलेले नाही. मात्र, यादव समाजाचा विरोध लक्षात घेता निर्मात्यांवर दबाव वाढत आहे.

‘१२० बहादुर’ या चित्रपटाच्या निमित्ताने केवळ एका ऐतिहासिक घटनेवर आधारित कथा मांडली जात असली, तरी त्यामागे असलेल्या सामाजिक ओळखीच्या मुद्द्यांमुळे हा चित्रपट आता वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. पुढील काही दिवसांत चित्रपट निर्माते काय भूमिका घेतात, आणि समाजाची प्रतिक्रिया काय राहते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews