Bollywood News : ‘दबंग’ चित्रपटाचे दिग्दर्शक अभिनव कश्यप पुन्हा एकदा वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून सलमान खानविरोधात त्यांनी सातत्याने गंभीर आणि आक्षेपार्ह विधानं केली होती. या विधानांमुळे सलमान खानचा एक निष्ठावान चाहता चांगलाच भडकला असून त्याने थेट पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत अभिनव कश्यप यांच्याविरुद्ध एफआयआरची मागणी केली आहे.
सलमान चाहत्याची तक्रार (Bollywood News)
मंगळवारी सलमान खानचा चाहता इमरान काझी आपल्या काही मित्रांसोबत मुंबईतील बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये पोहोचला. त्याने पोलिसांकडे लेखी अर्ज देत अभिनव कश्यप यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पापाराझींनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये इमरान काझीने आपली नाराजी आणि संताप व्यक्त केला. त्याने म्हटले की, “अभिनव कश्यप नावाचा व्यक्ती सतत पॉडकास्टमध्ये जाऊन सलमान भाईबद्दल अप्रिय आणि अश्लाघ्य बोलतो. अगदी खालच्या पातळीवर जाऊन त्यांच्याविषयी वाईट टिप्पणी करतो. त्यामुळे आम्ही आज पोलिस स्टेशनमध्ये तक्रार देण्यासाठी आलो आहोत.”
सलमान खानच्या समाजकार्याचा उल्लेख
इमरानने सलमान खानच्या चॅरिटी वर्कचा मुद्दा उपस्थित करत अभिनव कश्यप यांच्या आरोपांना खोटे ठरवले. त्याच्या म्हणण्यानुसार, सलमान खान आपल्या कमाईतील मोठा भाग सामाजिक कामांसाठी देणगी म्हणून देतात आणि ‘बीइंग ह्यूमन’ फाउंडेशनद्वारे आरोग्य, शिक्षण आणि मदतकार्याचे मोठ्या प्रमाणात काम केले जाते. त्यामुळे अशा माणसाचं नाव बदनाम करणं पूर्णपणे चुकीचं असल्याचं इमरानने स्पष्ट केलं.
नेत्यांकडे धाव घेण्याची तयारी
बांद्रा पोलिसांनी इमरान काझीची तक्रार ऐकून घेतली असून आवश्यक ती कारवाई केली जाईल, असे त्यांना सांगितल्याची माहिती देण्यात आली. मात्र, फक्त पोलिसांत तक्रार देऊन न थांबता इमरान काझी आता या प्रकरणात जलदगतीने कारवाई व्हावी म्हणून राज्याचे गृह मंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही भेटीची तयारी करत आहे. त्याने सांगितले की, “वरचा देव सलमान भाईला सलामत ठेवो, बाकी खालील लोकांना आम्ही फॅन्स उत्तर देऊ.”
अभिनव कश्यप यांचं वादग्रस्त वक्तव्य
अभिनव कश्यप यांनी मागील काही महिन्यांत विविध पॉडकास्ट आणि मुलाखतींमध्ये सलमान खानवर अनेक गंभीर आरोप केले होते. त्यांनी सलमान खानला गुंडा, बदतमीज व्यक्ती असे संबोधले होते. त्यांच्यावर आपला करिअर बर्बाद केल्याचा आरोपही कश्यप यांनी केला. ते ‘दबंग 2’ सोडण्याच्या निर्णयाविषयी बोलताना त्यांनी सलमान आणि त्यांच्या टीमला काम न करता उपकार करण्याची प्रवृत्ती असल्याचं म्हटलं होतं.






