कोकणातील प्रवाशांसाठी मोठी आनंदाची बातमी आहे…. एकीकडे सर्वत्र नवी मुंबई विमानतळाच्या उद्घाटनाची चर्चा सुरू असताना दुसरीकडे कोकणातील रत्नागिरीमध्ये सुद्धा लवकरच नवीन विमानतळ (Ratnagiri Airport) प्रवाशांसाठी खुले होणार आहे. राज्याची उद्योग मंत्री उदय सामंत यांनी याबाबत माहिती दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील हे विमानतळ पुढील 6 ते 7 महिन्यांत मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्णपणे तयार होईल. एप्रिल 2026 पर्यंत हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होईल तसेच यामुळे मुंबई ते रत्नागिरी 326 KM चे अंतर केवळ 1 तासात पार करता येणार आहे. असं उदय सामंत यांनी सांगितलं. यामुळे कोकणवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे.
मुंबई ते कोकण फक्त एक तासांत –
सध्या मुंबईवरून कोकणात जायचं म्हटलं तर प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो… मुंबई गोवा महामार्गाचे काम अजूनही 100% पूर्ण झालेले नाही…. त्यामुळे कोकणवासीय रेल्वे प्रवाशाला प्राधान्य देतात मात्र तिथेही मोठी गर्दी असतेच….. परिणामी कोकणी माणसाला मुंबईवरून यायचं म्हटलं तर जीव मुठीत घालूनच प्रवास करावा लागतो… मुंबई ते रत्नागिरीचे अंतर सुमारे 326 किलोमीटर आहे. रस्त्याने प्रवास केल्यास 7-8 तास लागतात, रेल्वे ने सुद्धा हीच अवस्था आहे. अशावेळी रत्नागिरी येथील विमानतळ कोकणवासीयांना खूप फायदेशीर ठरेल. कारण एकदा का रत्नागिरी विमानतळ (Ratnagiri Airport) सुरू झाले कि मग मुंबई ते कोकण हे अंतर अवघ्या एक तासात पार करता येणार आहे.
रत्नागिरी विमानतळ कधी होणार सुरु ? Ratnagiri Airport
मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी विमानतळाच्या प्रगतीबाबत अपडेट्स देताना म्हंटल कि, पुढील 6-7 महिन्यांत हे विमानतळ मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीसाठी पूर्ण तयार होईल. एप्रिल 2026 पर्यंत हे विमानतळ पूर्णपणे कार्यान्वित होईल. याशिवाय रत्नागिरी फ्लाईंग क्लबची स्थापना केली जाईल, ज्यामुळे या भागात एरोबॅटिक प्रशिक्षण आणि लहान विमानांच्या ऑपरेशन्ससाठी नवीन सुविधा उपलब्ध होतील.






