मुंबईतील कबुतरखाना हा अनेक वर्षांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. कबुतरांना दाणे टाकण्यासाठी उभारलेले कबुतरखाने शहरात मोठ्या प्रमाणावर दिसतात. परंतु, यामुळे मानवी आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. कबुतरांची विष्ठा आणि पंखांमधून निर्माण होणारी धूळ श्वसनमार्गात गेल्याने हायपरसेंसिटिव्हिटी न्यूमोनायटिस सारखे आजार उद्भवतात. त्यामुळे या प्रकरणात मधल्या काही दिवसांत मुंबईत मोठा वादंग झाल्याचे आपण सर्वांनी पाहिले. त्यानंतर आता मोठी अपडेट समोर येत आहे. या प्रकरणात तपास करून अहवाल देण्यासाठी एक समिती गठित करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.
13 सदस्यीय समितीचे गठन
दादर येथील कबूतरखान्याचा वाद चांगलाच चिघळला होता. कबूतरखाना बंद करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते. कबूतरांच्या विष्ठेमुळे माणसांना आजारांचा धोका निर्माण होत असल्याचे निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं होतं. आता या प्रकरणात मोठी अपडेट मिळाली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार मानवी आरोग्यावर कबूतरांचा परिणाम तपासण्यासाठी 13 जणांची तज्ज्ञ समिती गठीत करण्यात आली आहे. मुंबई उच्च न्यायालायाने 13 ऑगस्ट रोजी दिलेल्या आदेशानुसार ही समिती गठीत करण्यात आली आहे.
समिती नेमके काय काम करणार?
आता या समितीने कामकाजास सुरुवात करणार आहे. पहिल्या बैठकीपासून तीस दिवसांच्या आत अहवाल शासनाला सादर करणे अपेक्षित आहे. या समितीत सार्वजनिक आरोग्य, पर्यावरण, पशुवैद्यकीय, विज्ञान, सूक्ष्मजीवशास्त्र, फुप्फुसतज्ज्ञांच समावेश आहे. र्वजनिक आरोग्य सेवेचे संचालक विजय कंदेवाड या समितीचे अध्यक्ष आहेत. नगररचना विभागाचे संचालक जितेंद्र भोपळे सहसचिव आहेत. तसेच बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचे किशोर रिठे, एम्स नागपूरचे विभागप्रमुख डॉ. प्रदीप देशमुख, पशुसंवर्धन विभागाचे उपायुक्त डॉ. शिवाजी पवार, प्राणी कल्याण मंडळाचे सचिव डॉ. एसके दत्ता, फुप्फुसरोग तज्ज्ञ डॉ. सुजित रंजन व डॉ. अमिता आठवले, रोगप्रतिकारशक्ती तज्ज्ञ डॉ. मनिषा मडकईकर, पशुवैद्यकीय सार्वजनिक आरोग्यशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. आरजे झेंडे, सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या सहयोगी प्रा. डॉ. शिल्पा पाटील आणि मुंबई महापालिका आरोग्य अधिकारी दक्षा शाह या समितीत सदस्य आहेत. या समितीचा अहवाल आल्यानंतर सत्य समोर येणार आहे.






