Marathi News

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका; साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांची पहिली प्रतिक्रिया काय?

Written by:Rohit Shinde
Published:
2008 मध्ये मालेगाव येथे झालेल्या भीषण बॉम्बस्फोट प्रकरणात विशेष एनआयए न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांसह इतर सहा जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. त्यानंतर प्रज्ञासिंह ठाकुरांची प्रतिक्रिया समोर आली आहे.
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातून निर्दोष सुटका; साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांची पहिली प्रतिक्रिया काय?

2008 मध्ये मालेगाव बॉम्ब स्फोटाचा आज मुंबई विशेष न्यायालयाने निकाल दिला आहे. यामध्ये कोर्टाने या प्रकरणात साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांसह सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. मोटार सायकलमध्ये स्फोट झाल्याचेही सिद्ध झाले नाही, स्फोट झाल्याचे सिद्ध होत नाही, असे म्हणत कोर्टाने सातही आरोपींना निर्दोष मुक्त केले आहे. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकुर, कर्नल पुरोहित, रमेश उपाध्याय, समीर कुलकर्णी, अजय राहिरकर, सुधाकर द्विवेदी, सुधाकर चतुर्वेदी अशी या सात आरोपींची नावे आहेत. त्यामुळे तपास यंत्रणेला हा मोठा धक्का मानला जात आहे. आता या प्रकरणातुन निर्दोष साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

‘अन्यायाने शिक्षा सहन केली’

“हा भगव्या संस्कृतीचा आणि हिंदुत्वाचा विजय आहे. मला अनेक वर्षे अन्यायाने शिक्षा सहन करावी लागली, पण अखेर सत्य विजयी ठरलं.” अशी प्रतिक्रिया साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांनी आपल्या निर्दोष सुटकेनंतर दिली आहे. “‘जेव्हा पहिल्यांदा चौकशीला बोलावलं होतं तेव्हा मी माणुसकीच्या नाते न्यायचा सन्मान करून मी आले होते . 13 दिवस मला टॉर्चर करण्यात आलं माझं आयुष उध्वस्त केलं .मी 17 वर्ष अपमानित झाले .मला आतंकवादी बनवलं स्वतःच्याच देशात ..ज्यांनी मला हे दिवस आणले त्याबद्दल मी काही बोलू शकत नाही .संन्यासी आहे म्हणून मी जिवंत आहे” अशा शब्दांत साध्वी प्रज्ञासिंह ठाकुरांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

आजचा कोर्टाचा निकाल नेमका काय?

या संपूर्ण खटल्यादरम्यान 323 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. मात्र सुनावणीदरम्यान 40 साक्षीदार फितूर झाले तर 25 साक्षीदारांचा मृत्यू झाला. प्रसाद पुरोहितने आरडीएक्स आणल्याचा कोणताही पुरावा नाही. मोटार सायकलमध्ये स्फोट झाल्याचेही सिद्ध झाले नाही. या प्रकरणाचा पंचनामाही व्यवस्थित झाला नाही. साध्वी प्रज्ञासिंहच्या बाईकचा चेसी नंबरही नीट नव्हता, त्यामुळे ही गाडी प्रज्ञा सिंहची होती हे सिद्ध होत नाही.  बोटाचे ठसेही आढळले नाहीत. या आरोपींमध्ये बैठका झाल्याचा कोणताही पुरावा नाहीत त्यामुळे कट शिजला हे सिद्ध करायला आवश्यक पुरावे नाहीत असे कोर्टाने या निकालामध्ये म्हटले आहे.

साध्वी प्रज्ञासिंह आरोपी होण्याचे कारण?

मालेगावच्या भिक्कू चौकात झालेल्या बॉमस्फोटात 6 निष्पाप मुस्लिम नागरिकांचा मृत्यू झाला होता, 100 पेक्षा जास्त लोक यात जखमी झाले होते. या बॉम्बस्फोटाने संपूर्ण महाराष्ट्र जो हादरून गेला होता. घटनास्थळावर सापडलेली मोटरसायकल हिंदुत्ववादी नेत्या साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांची असल्याने त्यांच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews