दिड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज, गणेश मिरवणुकी दरम्यान ‘या’ सूचनांचे पालन करण्याचे पालिकेकडून आवाहन

Written by:Astha Sutar
Published:
पुलावर एका वेळेस भाविकांनी जास्त गर्दी न करता, पुलावर जास्त वेळ न थांबता त्वरित पुलावरुन पुढे जावे, पोलीस व पालिका प्रशासनाने दिलेल्या सुचनेनुसार मार्गक्रमण करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.
दिड दिवसांच्या गणपती विसर्जनासाठी प्रशासन सज्ज, गणेश मिरवणुकी दरम्यान ‘या’ सूचनांचे पालन करण्याचे पालिकेकडून आवाहन

Ganesh Festival – गेल्या कित्येक दिवसांपासून बाप्पाच्या आगमनासाठी भाविक आतुर होते. अखेर आज लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे. लाडक्या बाप्पा आज विराजमान झाला आहे. दरम्यान, यावर्षी गणेशोत्सव सात दिवसांचे आहेत. तर उद्या दिड दिवसांच्या गणपीचे विसर्जन होणार आहे. या धरतीवर पालिका प्रशासन सज्ज झाले आहे. उद्या (गुरुवारी) दिड दिवसांच्या गणपीचे विसर्जन होणार आहे. त्यामुळं मुंबईत अनेक तलाव तसेच समुद्रकिनारी सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. तर गणेश मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी पालिका प्रशासनाने काही सूचना केल्या आहेत.

विसर्जन मार्गात १२ पूल धोकादायक

दरम्यान, गणेशभक्तांनी श्रीगणेशाचे आगमन-विसर्जनाच्या मिरवणुकीदरम्यान या पुलांवरून जाताना काळजी घ्यावी. तसेच पालिका क्षेत्रातील मध्य व पश्चिम रेल्वे मार्गावरील १२ पूल धोकादायक स्वरुपाचे आहेत. काही पुलांच्या दुरुस्तीची कामे सुरू आहेत. तर काही पुलांची कामे पावसाळ्यानंतर सुरू करण्यात येणार आहेत. याबाबत बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलीस यांच्या वतीने वेळोवेळी करण्यात येणाऱ्या सूचना व निर्देशांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे. या १२ पुलांवर एकावेळेस अधिक वजन होणार नाही, याची काळजी घ्यावी. या पुलांवर ध्वनिक्षेपकाचा वापर करुन नाचगाणी करण्यात येऊ नये. उत्सवाचा आनंद पुलावरुन खाली उतरल्यावर घ्यावा. असं पालिकेनं म्हटलेय.

कोणती आहेत धोकादायक पूल?

पश्चिम रेल्वे मार्गावरील मरीन लाईन्स रेल्वे उड्डाणपूल, सँडहर्स्ट रोड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फ्रेंच रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), केनडी रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व चर्नी रोडच्या मध्ये), फॉकलॅन्ड रेल्वे उड्डाणपूल (ग्रॅन्ट रोड व मुंबई सेंट्रलच्या मध्ये), महालक्ष्मी स्टेशन रेल्वे उड्डाणपूल, प्रभादेवी–कॅरोल रेल्वे उड्डाणपूल आणि दादर येथील लोकमान्य टिळक रेल्वे उड्डाणपूल हे धोकादायक पूल असल्याचे पालिकेनं म्हटलं आहे.

तर दुसरीकडे मध्य रेल्वेवरील घाटकोपर रेल्वे उड्डाणपूल, करी रोड रेल्वे उड्डाणपूल, आर्थर रोड रेल्वे उड्डाणपूल किंवा चिंचपोकळी रेल्वे उड्डाणपूल, भायखळा रेल्वे उड्डाणपुलावरून मिरवणूक नेताना काळजी घ्यावी. असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews