छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; राजभवनात पार पडला सोहळा

Written by:Rohit Shinde
Published:
आज अखेर छगन भुजबळांनी महाराष्ट्र्राचे कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. राजभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला...
छगन भुजबळांनी घेतली मंत्रिपदाची शपथ; राजभवनात पार पडला सोहळा

छगन भुजबळ यांनी आज राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली, सकाळी 10 वाजता राजभवनात हा सोहळा पार पडला. यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते. भुजबळांना धनंजय मुंडेेंच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेलं अन्न आणि नागरीपुरवठा खातं मिळणार असल्याची माहिती आहे.

भुजबळांना संधी देण्याचे कारण?

छगन भुजबळ यांची ओबीसी नेते अशी ओळख आहे. राज्यातील ओबीसी मतदारांवर छगन भुजबळांचा मोठा प्रभाव आहे. त्यामुळे त्यांच्या या छबीचा महायुती सरकारला स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत फायदा होऊ शकतो. ओबीसी मतांंसाठी असा निर्णय घेतला असावा अशी चर्चाही राजकीय वर्तुळात रंगली आहे. दुसरीकडे मराठा आरक्षणाच्या वादळात देखील महाराष्ट्र विधानसभा 2024 निवडणुकीत छगन भुजबळ येवला मतदारसंघातून उभे होते. यावेळी त्याने 1 लाख 34 हजार 154 मतं पडली होती. त्यांनी शरद पवार गटाच्या माणिकराव शिंदे यांचा पराभव केला होता. माणिकराव शिंदे यांना 1 लाख 8 हजार 2 मतं पडली होती. त्यामुळे भुजबळांचा महत्व नाकारता येत नाही.

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसी मतदार आपल्यासोबत राहण्यासाठी महायुतीकडून आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीने ही खेळी खेळल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या रुपाने ओबीसी नेतृत्व या आधी मंत्रिमंडळात होतं. पण त्यांच्या राजीनाम्यानंतर आता छगन भुजबळांच्या रुपाने ओबीसी नेता मंत्रिमंडळात असणार आहे.

‘राजकारणात सभ्य माणसं नाहीत का?’

भुजबळांना मंत्रिपद मिळणार ही बातमी समजताच अंजली दमानियांनी संताप व्यक्त केला आहे. ‘  एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री येणार? जनता अशीच भरडली जमणा? की हा माझ्यासारख्या भ्रष्टाचार विरोधी लढणाऱ्यांना संदेश आहे, की तुम्ही आमच काहीच वाकड करू शकत नाही ? असा काय नाईलाज आहे ? की सभ्य माणसं मिळत नाहीत राजकारणात ? “भ्रष्टाचारीयो पर कारवाई के लिए, अब की बार 400 पार” “भ्रष्टाचार के खिलाफ मोदी सरकार के बडे कदम” हा आहे का तो बडा कदम ? ही ती कारवाई ?’ तुम्हाला राजकारणात सभ्य माणसं मिळत नाहीत का? असा सवाल दमानियांनी उपस्थित केला आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews