Marathi News

मुसळधार पावसाचा धाराशिव जिल्ह्याला तडाखा; मोठ्या प्रमाणात वित्तहानी, पिके उध्वस्त

Written by:Rohit Shinde
Published:
पावसामुळे पीक वाया गेलं असून शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. केवळ शेतीवर उदरनिर्वाह भागत असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक कठीण परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे.
मुसळधार पावसाचा धाराशिव जिल्ह्याला तडाखा; मोठ्या प्रमाणात वित्तहानी, पिके उध्वस्त

पुढील तीन ते चार दिवस राज्यात अनेक ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज आहे. विजांच्या कडकडाटास पाऊस होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आलं आहे.  दुसरीकडे धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आहे. यामुळे मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून पिकांना देखील मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेल्या पिकांचे नुकसान झाले आहे.

धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसाचा तडाखा

धाराशिव जिल्ह्यामध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस झाला. मागील दहा ते बारा दिवस थांबलेल्या पावसाने पुन्हा आगमन केलं आहे. परतीच्या पावसाने धाराशिव जिल्ह्यात धुमाकूळ घातला असून जिल्ह्यातील काही भागांमध्ये पाणी साठलं, तर तेरणाकाठच्या गावाला धोक्याचा इशारा देण्यात आलेला आहे. भंडारवाडी, इर्ला या रस्त्यावरील पूल पाण्यात गेला असून येथील वाहतूक ठप्प झाली आहे. तर धाराशिव तालुक्यातील बोरखेडा येथील शेतकरी अभिजीत सुरवसे यांच्या दोन एकर सोयाबीनमध्ये पाणी साठले असून संपूर्ण सोयाबीन पाण्यात गेलं आहे.

मुसळधार पावसाने पिकांचे मोठे नुकसान

पावसामुळे पीक वाया गेलं असून शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे. केवळ शेतीवर उदरनिर्वाह भागत असलेल्या शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक कठीण परिस्थितीचा सामना करण्याची वेळ आली आहे. तेरणा नदीला पूर आला असून तेरणा काठच्या गाव, वाडी, वस्ती यांना प्रशासनाने गावं रिकामी करण्याची पूर्वकल्पना दिली आहे. कुठलीही दुर्घटना, अनुचित प्रकार घडू नये याची प्रशासनाने खबरदारी घेतली आहे. गेल्या महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील दीड लाख हेक्टरवर नुकसान झालं होतं. यात सोयाबीन, मूग, उडीद याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. या अतिवृष्टीमध्ये धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा अडचणीत आला आहे.

शेलगाव गावात तुफान पाऊस झाला असून लोकांच्या घरात पाणी शिरल्याने नागरिकांची मोठी अडचण झाली आहे . तर रात्रीच्या पावसामुळे धाराशिव-ढोकी मार्गावरील नदीचा पूल पाण्याखाली गेला होता. त्यामुळे रात्री नऊ वाजल्यापासून लातूर बार्शी रस्ता वाहतुकीसाठी बंद केला असून तेरणा नदीला पूर आल्याने त्यांना तिकडच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे. धाराशिव जिल्ह्यात आज देखील ढगाळ वातावरण असल्याने पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. नागरिकांनी काळजी घेण्याच्या आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews