महाराष्ट्रातील पावसाचा जोर काही कमी होताना दिसत नाही. मान्सूनचा प्रभाव संपला असला तरी अवकाळी पाऊस अनेक ठिकाणी बरसत आहे. दक्षिण भारतातील राज्यांतील पावसाचा प्रभाव महाराष्ट्रात देखील जाणवत आहे. राज्यातील पावसाबाबत आता हवामान विभागाकडून पुन्हा एकदा मोठी अपडेट समोर आली आहे. नोव्हेंबर महिना सुरू झाला तरी पावसाचा जोर कायम आहे. सोमवारी पुन्हा अवकाळी संकट घोंघावत असून पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
सोमवारी राज्यात मुसळधार बरसणार ?
महाराष्ट्रात मे महिन्यापासून पावसाळा सुरू असल्याचे चित्र असून नोव्हेंबरमध्ये देखील पावसाचा जोर कायम आहे. मराठवाडा, विदर्भासह मुंबई आणि कोकणात देखील रविवारी हलक्या ते मध्यम पावसाने हजेरी लावली. त्याननंतर सोमवारी देखील राज्यातील काही भागात पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रासह मराठवाड्यातील 4 जिह्यांना पुन्हा यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
सोमवारी मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ आकाशासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता कुलाबा वेधशाळेने वर्तवली आहे. कोकण विभागातील अन्य जिल्ह्यांमध्ये देखील असेच हवामान राहील. राज्यातील मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात पुढील 2 दिवस पावसाची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रात पुणे, सांगली, सोलापूर मध्ये विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. तर सोलापूर जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर महाराष्ट्रातील नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यात ढगाळ हवामान पहायला मिळेल.
मराठवाडा-विदर्भात पावसाचा अंदाज
मराठवाड्यात धाराशिव, लातूर, आणि बीड या तीन जिल्ह्यांत विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहतील. तर छत्रपती संभाजीनगरसह उर्वरित जालना, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांत हलक्या पावसाची शक्यता आहे. विदर्भात सोमवारी ढगाळ हवामान राहणार आहे. तसेच तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. तुरळक ठिकाणी हलक्या सरी वगळल्यास विदर्भात जोरदार पावसाची शक्यता नाही. तसेच सोमवारी कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा महत्त्वाचा अलर्ट नाही. 5 नोव्हेंबरपर्यंत हवामानाची हीच स्थिती राहणार असल्याने शेतकरी आणि नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
रब्बी हंगामावर संकट, शेतकरी चिंतेत
सततच्या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे राज्यातील रब्बीचा हंगाम देखील मागास होण्याची चिन्हे सध्या दिसत आहेत. दरम्यान नैऋत्य मान्सून राज्यातून पूर्णपणे माघारी फिरला आहे. तयार झालेल्या पोषक हवामानामुळे राज्यामध्ये काही जिल्ह्यांमध्ये हलक्यातील मध्यम सरींची शक्यता हवामाना विभाग आणि आगामी काळामध्ये वर्तवली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाज लक्षात घेऊन शेती कामाचे नियोजन करावे असं आवाहन देखील करण्यात आला आहे. शेतकरी सध्या चिंतेत आहेत.






