राज्यात यंदा मुसळधार पावसाने थैमान घातलं आहे. खास करून मराठवाडा आणि विदर्भात अतिवृष्टीचा मोठा फटका बसलाय. शेतकऱ्याच्या घरात पाणी गेले. संपूर्ण शेतातील पीक पाण्याखाली आहे…. घरे वाहून गेली, जनावरे वाहून गेली… बळीराजा अक्षरशा मदतीसाठी टाहो पडतोय. राज्य सरकारने अतिवृष्टी ग्रस्त शेतकऱ्यांसाठी 2215 कोटी रुपये मंजूर केले आहेत. अनेक आमदार खासदारही आपला एका महिन्याचा पगार पूरग्रस्तांना देत आहेत. अशातच आता मुंबईतील लालबागचा राजाही अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांसाठी धावून आला आहे. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून शेतकऱ्यांसाठी 50 लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली आहे.
मंडळाकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे 50 लाखाचा धनादेश सुपूर्द केला जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वेळ घेऊन मुख्यमंत्र्यांकडे हा धनादेश सुपूर्द जाणार केला आहे. दरम्यान, विविध सामाजिक संघटनांकडून मुख्यमंत्री सहायता निधीत अतिवृष्टीबाधितांच्या मदतीसाठी पैसे जमा करण्याचं आवाहन केलं जातं आहे. राज्यातील सर्व शिक्षक आपला एक दिवसाचा पगार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत.
अजित पवारांच्या नेत्यांकडून एक पगार –
राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व मंत्री, खासदार, आमदार आणि विधानपरिषद आमदार आपला एक महिन्याचा पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीत जमा करणार आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी याबाबत माहिती दिली आहे. संकटाच्या या कठीण काळात प्रत्येक नेत्याने महाराष्ट्राच्या जनतेसोबत उभं राहणं गरजेचे असल्याचे तटकरे यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नेहमीच शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांसाठी खंबीरपणे उभा आहे. पक्षाच्या वतीने लवकरच आणखी काही मदत योजनांची घोषणा करण्यात येणार असल्याचेही सुनील तटकरे यांनी सांगितले.
शिंदे गटाचे नेतेही पगार देणार –
दरम्यान, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री आणि आमदार-खासदार सुद्धा आपला एका महिन्याचा पगार पुरग्रस्तांच्या मदतीसाठी देणार आहेत. एकनाथ शिंदे यांनी याबाबत घोषणा केली आहे.






