PALGHAR GAS LEAKED –पालघरमधील तारापूरमधून एक धक्कादायक व दुख:द बातमी समोर येत आहे. तारापूरातूल एका औषध कंपनीत वायु गळतीमुळं मोठी दुर्घटना घडली आहे. कंपनीत वायु गळती होऊन नायट्रोजन वायू नाकात शिरल्यानं या ४ कामगारांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर येत आहे. तसेच अन्य दोघांची प्रकृती गंभीर असल्याचेही समोर येत आहे. या घटनेमुळं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
कंपनीत नेमकं काय घडलं?
दरम्यान, एमआयडीतील एका कंपनीत दुपारी २.३० ते ३ च्या दरम्यान एका युनिटमधील नायट्रोजन वायू गळतीमुळे तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर विपरित परिणाम झाला. कंपनीतील त्रास होत असलेल्या सहा कामगारांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं, त्यापैकी चार जणांचा सायंकाळी ६.१५ च्या सुमारास मृत्यू झाला. या वायुगळतीमुळे या कामगारांना श्वास घेण्यात अडचण यायला लागली. गळती झालेला नायट्रोजन वायू या कामगारांच्या नाकात शिरल्यानं त्यांची अवस्था बिकट झाली. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. अशी माहिती पालघर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे प्रमुख विवेकानंद कदम यांनी सांगितलं.





