Marathi News

22 जूनपासून आठवडाभर मुंबईत कमी दाबाने पाणीपुरवठा; कारण काय?

Written by:Rohit Shinde
Published:
मुंबईतील मेट्रो प्रकल्पाच्या कामामुळे मुंबईतील काही भागात आठवडाभर कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे. त्यामुळे आठवडाभर मुंबईकरांची डोकेदुखी चांगलीच वाढणार आहे.
22 जूनपासून आठवडाभर मुंबईत कमी दाबाने पाणीपुरवठा; कारण काय?

मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी समोर येत आहे. त्यानूसार, मुंबईत विविध ठिकाणी विकासकामे मोठ्या प्रमाणात सुरू आहेत. यापैकीच एक असलेल्या मुंबई मेट्रोचे सुद्धा विविध प्रकल्प सुरू आहेत. परिणामी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील अनेक भागांत 22 जूनपासून पुढील काही काळ कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. मेट्रोच्या सुरू असलेल्या विविध कामांमुळे कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती आहे.

मेट्रोच्या कामांमुळे कमी दाबाने पाणीपुरवठा

मेट्रो – 7 अ प्रकल्पाच्या कामांमुळे रविवार ( 22 जून 2025) पासून शनिवार (28 जून 2025) पर्यंत के पूर्व विभागातील काही भागांमध्ये सायंकाळी कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून आणि काटकसरीने वापरण्याचे आवाहन मुंबई महानगरपालिकेने केले आहे. मुंबई मेट्रो-7 अ प्रकल्प अंतर्गत, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे, के पूर्व प्रभागातील, बामणवाडा अंधेरी (पूर्व) जवळ, वेरावली जलाशयाच्या (24X7) कार्यान्वित असलेल्या 1800 मिलीमीटर व्यासाच्या निगमवाहिनीखाली बोगदा खणन संयंत्राद्वारे खोदकाम करण्यात येणार आहे.

हे खोदकाम रविवार (22 जून 2025) पासून शनिवार (28 जून 2025) या कालावधीत सकाळी 7.30 ते दुपारी 3.30 पर्यंत आणि रात्री 9.30 ते मध्यरात्री नंतर 3.30 वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. त्यामुळे के पूर्व विभागातील काही भागांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. जाणून घ्या याबाबतचे नियोजन नेमके कसे आहे.

पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन

विलेपार्ले (पूर्व) – सायंकाळी 5 ते रात्री 8 वाजेदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. जुना नागरदास मार्ग, नवीन नागरदास मार्ग, मोगरापाडा, अंधेरी-कुर्ला मार्ग (अंधेरी स्थानक ते पश्चिम द्रुतगती मार्ग) – रात्री 8 ते 9.30 वाजेदरम्यान कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाण्याचा आवश्यक साठा करुन ठेवावा. तसेच काटकसरीने पाणी वापरुन सहकार्य करावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. त्यामुळे मुंबईकरांची आठवडाभर डोकेदुखी वाढणार आहे.

 

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews