Ashish Shelar – येत्या २७ ऑगस्ट रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. मात्र सलग तीन दिवस झालेल्या पावसामुळे मुंबईतील रस्त्यावर निर्माण झालेले खड्डे येत्या ३ दिवसांत गणपतीपूर्वी पूर्णपणे भरा, असे निर्देश मुंबई उपनगर पालकमंत्री आशिष शेलारांनी प्रशासनाला दिले.
या वर्षीपासून राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवा साजरा करण्यात येणार असून याबाबत मुंबईच्या यंत्रणांची आढावा बैठक आशिष शेलार यांनी घेतली. त्यावेळी ते बोलत होते.
तब्बल ८ हजार तक्रारी दाखल
दरम्यान, हापालिकेकडे आतापर्यंत तब्बल ८ हजार तक्रारी दाखल झाल्या आहेत. याशिवाय अनेक ठिकाणी खड्डे असून या बैठकीत येत्या तीन दिवसांत, गणपतीपूर्वी सर्व खड्डे पूर्णपणे भरण्याचे स्पष्ट निर्देश दिले. मुंबईत पावसामुळे रस्त्यावर निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे मुंबईकरांची चिंता वाढली आहे. रस्त्यांवर, हायवेवर, आतील रस्त्यांवरील खड्ड्यांबाबत मोठ्या प्रमाणावर तक्रारी येत असून, आज या संदर्भात मुंबई महापालिका आयुक्त, एमएसआरडीसी, एमएमआरडीए, जिल्हाधिकारी, बॉम्बे पोर्ट ट्रस्ट यांसह संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली.
तातडीने उपाययोजना कराव्यात
दुसरीकडे वाकोला, विक्रोळी, गोरेगाव आदी ठिकाणच्या उड्डाणपुलांवर पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीची कोंडी वाढत असल्याचे लक्षात घेऊन, एमएसआरडीसीने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा महापालिका स्वतः खड्डे भरण्याचे काम हाती घेईल, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. महापालिकेकडून खड्डे भरण्यासाठी वापरले जाणारे ‘मास्टीक तंत्रज्ञान’ वाहतुकीच्या दृष्टीने प्रभावी ठरत असल्याने, झोननिहाय नियुक्त कंत्राटदारांकडून हेच तंत्रज्ञान वापरून काम करण्याच्या सूचना आयुक्तांनी दिल्या. तसेच गणपतीपूर्वी मुंबई खड्डेमुक्त करण्याच्या उद्देशाने सर्व कामे तातडीने पूर्ण करून त्याचा अहवाल सादर करण्याचा निर्देश आजच्या बैठकीत दिले.





