पर्यावरणपूरक कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाला सध्या अधिकाधिक लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. निसर्ग रक्षणाच्या दृष्टीने ही एक सकारात्मक आणि स्वागतार्ह पायरी मानली जात आहे. पारंपरिक जलस्रोतांमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी अनेक नागरिक, संस्था आणि मंडळे कृत्रिम तलावात विसर्जन करतात. त्यामुळे नद्यांचे व तलावांचे प्रदूषण कमी होते आणि जलीय जीवसृष्टीचे रक्षण होते.
शिवाय, शाडू मातीच्या मूर्ती वापरून विसर्जन केल्याने पर्यावरणाला धोका होत नाही. महानगरपालिकाही यासाठी विशेष व्यवस्था करते. जनजागृतीमुळे ही चळवळ वाढीस लागली असून भाविकांचा सहभाग उत्साहवर्धक आहे. अशी कृती पर्यावरण संवर्धनासाठी महत्त्वाची ठरते. यंदा मुंबईतून देखील अशीच काहीशी सकारात्मक बातमी समोर आली आहे. मुंबईकरांनी कृत्रिम तलावातील गणेश विसर्जनाला मोठी पसंती दिल्याचे यावरून स्पष्ट होते.
कृत्रिम तलावात २ लाख मुर्तींचे विसर्जन
मुंबईतील श्रीगणेशोत्सवात यंदा एकूण 1 लाख 97 हजार 114 श्रीगणेशमूर्तींचे विसर्जन झाले. यामध्ये 1 लाख 81 हजार 375 घरगुती तर 10 हजार 148 सार्वजनिक श्रीगणेशमूर्ती तसेच गौरी आणि हरतालिका मिळून 5 हजार 591 मूर्ती समाविष्ट आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिकेने पर्यावरणपूरक श्रीगणेशोत्सवासाठी केलेल्या जनजागृतीला यंदा मुंबईकरांनी उदंड प्रतिसाद दिला. त्यामुळे कृत्रिम विसर्जनस्थळांवर मूर्ती विसर्जित करण्याचा ओघ यंदा वाढला. त्यामुळे मुंबईकरांनी यंदा खऱ्या अर्थान पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल उचलले असेच म्हणावे लागेल.
जल प्रदूषण रोखण्यासाठी महत्वाचे पाऊल
उच्च न्यायालय यांनी दिलेले निर्देश, महाराष्ट्र शासनाच्या सूचना, केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची मार्गदर्शक तत्वे याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाकडून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव 2025 संदर्भात योग्य नियोजन आखून सर्व तयारी करण्यात आली होती. या तयारीला सर्व सार्वजनिक मंडळाकडून, श्रीगणेश भक्तांकडून प्रतिसाद लाभावा, यासाठी व्यापक जनजागृती करण्यात आली होती.
पर्यावरण पूरक गणेश विसर्जनाचे महत्त्व फार मोठे आहे. पारंपरिक विसर्जनामुळे नद्यांमध्ये आणि तलावांमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. यातून जलप्रदूषण वाढते, जलीय जीवांचे जीवन धोक्यात येते आणि पिण्याच्या पाण्यावरही परिणाम होतो. पर्यावरण पूरक विसर्जनामध्ये शाडू मातीच्या मूर्ती, नैसर्गिक रंग, आणि कृत्रिम विसर्जन टाक्यांचा वापर केला जातो. यामुळे निसर्गाचे संवर्धन होते आणि भाविकांची श्रद्धाही अबाधित राहते. अशा प्रकारच्या पर्यावरण स्नेही उपक्रमांमुळे भविष्यातील पिढ्यांसाठी स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण राखता येते. शाळा, संस्था आणि शासन यामार्फत जनजागृती वाढल्यामुळे ही चळवळ अधिक व्यापक होत आहे.






