State Rain : राज्यातील काही भागात पुढील २४ तासासाठी मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आलेला आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
उंच लाटांचा इशारा…
दरम्यान, भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्राकडून सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २३ आणि २४ जुलै रोजी ३.६ ते ४.३ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला आहे. तसेच पालघर आणि रायगड जिल्ह्यांच्या किनारपट्टीला २४ जुलै रोजी रात्रौ ८.३० पर्यंत ३.४ ते ३.८ मीटर उंच लाटांचा इशारा देण्यात आला असून, लहान होड्यांना समुद्रास न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, अशी माहिती राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून देण्यात आली.
‘या’ भागात ऑरेंज अलर्ट जारी…
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये तसेच सातारा घाट, कोल्हापूर घाट या भागात पुढील २४ तासासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला असल्याने जिल्हा प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. आपत्तीच्या अनुषंगाने राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दल यांनाही आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत.
गेल्या २४ तासात पावसामुळं दुर्घटना कुठे?
राज्यात गेल्या २४ तासात राज्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळं दुर्घटना घडल्या आहेत. अतिवृष्टीमुळे हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील मौजे बरडा येथे तीन व्यक्ती मंदिरात पुरामुळे अडकले असता स्थानिक बचाव पथकामार्फत सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, येथील परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे. परभणी जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात ११७.८ मी.मी. पाऊस झाला.
या पावसामुळे मौजे हदगाव नखाते, येथील सात ते आठ नागरिक पुराच्या पाण्यात घराच्या छतावर अडकले होते, आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने त्यांना सुखरूप बाहेर काढले आहे. तसेच बाधित नागरिकांना सुखरूप स्थळी हलविण्यात आले असून परिस्थिती नियंत्रणात आहे.





