महाराष्ट्रातील नवरात्री उत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाने साजरा केला जातो. देवी दुर्गेची आराधना, घटस्थापना, गोंधळ, दांडिया आणि गरबा या उत्सवाचे आकर्षण असते. नऊ दिवस भक्त विविध स्वरूपातील देवीची पूजा करतात. ग्रामीण भागात जत्रा तर शहरात सांस्कृतिक कार्यक्रमांची उत्साहपूर्ण रेलचेल असते. अशा परिस्थितीमध्ये कोल्हापुरातील करवीर निवासीन अंबाबाई मंदिरात नवरात्रीची तयारी करण्यात येत आहे. देवस्थान ट्रस्टकडून काटेकोर नियोजन केले जात आहे. त्याबाबत अधिक जाणून घेऊ…
अंबाबाई मंदिरात नवरात्रीची तयारी
कोल्हापूरच्या करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये नवरात्रौत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. भाविकांना देवीचे दर्शन अतिशय कमी वेळेत आणि चांगल्या पद्धतीने घेता यावं यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन रांग तयार केली आहे. ऊन किंवा पावसाचा कोणताही परिणाम होऊ नये अशा पद्धतीने मंडप उभारला आहे. दरम्यान नवरात्रौत्सव काळात अंबाबाई मंदिरात रोज सरासरी तीन ते चार लाख भाविक येतात. देवीचा पालखी सोहळा, नगर प्रदक्षिणा ललित पंचमीला होणारी टेंबलाई देवीची भेट आणि मंदिरातील धार्मिक सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी भाविकांची मोठी गर्दी असते. मंदिर समितीकडून अनेक गोष्टींचे काटेकोर असे नियोजन केले जात आहे.
शहरातील पोलीस यंत्रणा सतर्क
आता यावर नजर ठेवण्यासाठी यंदा पोलिसांकडून एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जात आहे. यासाठी दोन खासगी कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंपन्यांची यंत्रणा मंदिरातील गर्दीवर नजर ठेवून दुर्घटना टाळण्यासाठी पोलिसांना सूचना देईल. आपत्कालीन धोके दुर्घटना घडून येत यासाठी पूर्वसूचना मिळेल, त्यानुसार पोलिसांना काम करता येणार आहे.शहरातील वाहनांची गर्दी कोंडी झालेले रस्ते पर्यायी मार्ग यांची माहिती या तंत्रज्ञानाद्वारे वाहतूक पोलिसांना मिळणार आहे.
२२ सप्टेंबरपासून नवरात्रीचा उत्सव
२०२५ च्या नवरात्री उत्सवात खरंतर एक दुर्मिळ योगायोग चालून आला आहे. दरवर्षीप्रमाणे, यावर्षीही देशभरात नवरात्राचा पवित्र सण मोठ्या उत्साहात साजरा केला जाईल. पण यावेळी एक विशेष गोष्ट आहे: हा सण ९ ऐवजी १० दिवस चालेल. ज्योतिषशास्त्रीय गणनेनुसार, तृतीया तिथी दोन दिवस चालेल, ज्यामुळे नवरात्रात एक दिवस वाढ होईल. २२ सप्टेंबरपासून सुरू होणार यंदाचा नवरात्री उत्सव काहीसा विशेष आहे. सण-उत्सवांचा महिना जवळ आला आहे. दरवर्षी आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील प्रतिपदा तिथीपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होते. या नऊ दिवसांमध्ये आदिशक्ती आई दुर्गा आणि तिच्या नऊ रूपांची भक्तीभावाने पूजा केली जाते.






