आज दिनांक 31 ऑगस्ट रोजी राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग यांसह पुणे, सातारा आणि कोल्हापूरच्या घाटमाथ्यावरील परिसरात मुसळधार पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भातील अकोला, अमरावती आणि गडचिरोली जिल्ह्यांमध्येही पावसाचा जोर वाढेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सर्वत्र पावसाचा जोर वाढणार
दरम्यान, मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, बुलडाणा तसेच वाशीम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पाऊस पडू शकतो. या सर्व जिल्ह्यांसाठी हवामान खात्याने यलो अलर्ट जारी केला असून, नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. त्यामुळे मराठवाडा-विदर्भात आगामी काही दिवसांत पावसाचा जोर चांगलाच वाढणार आहे.
मुंबईसह कोकणात पावसाचा अंदाज
गेल्या काही दिवसांपासून कोकण किनारपट्टीवर अधूनमधून जोरदार सरी बरसत आहेत. आज 31 ऑगस्ट मुंबई, ठाणे आणि नवी मुंबई परिसरात मोठा पावसाचा इशारा नसला तरी रिमझिम ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने (Weather) वर्तवला आहे. तर रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पालघर जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला असून, काही ठिकाणी मुसळधार पावसाचा धोका असल्याची शक्यता व्यक्त केली आहे.
सकाळपासूनच मुंबईत ढगाळ वातावरण असून, अधूनमधून हलक्या सरी बरसत आहेत. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, दुपारनंतर पावसाची तीव्रता थोडी वाढू शकते. मात्र, मुसळधार पावसाची शक्यता कमी आहे. आज मुंबईतील किमान तापमान सुमारे 25 अंश सेल्सियस, तर कमाल तापमान 30 अंश सेल्सियसच्या आसपास राहील, असा अंदाज आहे.
वाऱ्यांचा वेग सौम्य ते मध्यम स्वरूपाचा असून, तो ताशी 15 ते 20 किलोमीटरपर्यंत जाऊ शकतो. दरम्यान, समुद्रातील भरतीदरम्यान पाणी वाढण्याची शक्यता असल्याने किनारपट्टी भागातील नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन हवामान विभागाने केले आहे. या काळात राज्यातील नागरिकांनी विशेष सतर्कता बाळगावी असे आवाहन हवामान विभागाकडून करण्यात आले आहे.






