शनि-शिंगणापूर विश्वस्त कार्यालयाला टाळे ठोकले; जिल्हाधिकारी पंकज अशियांच्या हातामध्ये सुत्रे

Written by:Rohit Shinde
Published:
काही दिवसांपूर्वी शनि-शिंगणापूर देवस्थानची विश्वस्त समिती बरखास्त करण्यात आली. त्यानंतर आता जिल्हाधिकारी पंकज अशिया यांनी सुत्रे हातामध्ये घेतली असून विश्वस्त कार्यालयाला टाळे ठोकण्यात आले आहेत.
शनि-शिंगणापूर विश्वस्त कार्यालयाला टाळे ठोकले; जिल्हाधिकारी पंकज अशियांच्या हातामध्ये सुत्रे

अहिल्यानगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थानमध्ये विविध प्रकारचे गैरव्यवहार झाल्याचे समोर येत होतं. ज्यामध्ये ॲप बनावट प्रकरण, बोगस कर्मचारी भरती घोटाळा त्याचबरोबर आर्थिक गैरव्यवहार त्यातून झालेल्या अधिकाऱ्यांच्या आत्महत्या मात्र आता शनिशिंगणापूरचं विश्वस्त मंडळ अखेर बरखास्त करण्यात आलं. त्यानंतर आता जिल्हाधिकारी पंकज अशियांना सुत्रे हातामध्ये घेतली आहेत. त्यानतंर देवस्थान परिसरातील विश्वस्त समितीच्या कार्यालयाला अखेर टाळे ठोकण्यात आले आहेत.

जिल्हाधिकाऱ्यांच्या हातामध्ये संपूर्ण कारभार

शनेश्वर देवस्थानचा जिल्हाधिकारी पंकज कुमार अशिया यांनी चार्च घेतला असून सर्व सूत्र आपल्या हाती घेतले आहेत. तसेच पंकज कुमार अशिया असे यांनी देवस्थानच्या कर्मचाऱ्यांना आदेश केले आहे की देवस्थानचे सर्व कार्यालय सील करण्यात यावेत व माझ्या परवानगीशिवाय कुणालाही या ठिकाणी कार्यालयामध्ये माझ्या परवानगी येऊ देऊ नये असा आदेश जिल्हाधिकारी पंकज कुमार आशिया यांनी देवस्थानच्या अधिकृत अधिकाऱ्यांना केला आहे ‌.

विश्वस्त मंडळ बरखास्त, जिल्हाधिकाऱ्यांकडे सूत्रे

श्री शनैश्वर देवस्थान विश्वस्त मंडळाच्या व्यवस्थापनाखाली असताना, देवस्थानच्या प्रशासनात विविध प्रकारच्या अनियमितता, बनावट अॅप्स संदर्भातील घोटाळा, आर्थिक गैरव्यवहार व भ्रष्टाचार, देवस्थानातील हिंदू व मुस्लिम धर्मीय कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झालेली वैमनस्यपूर्ण परिस्थिती, श्री शनिदेवाचे चौथऱ्यावरुन वाद, यावरुन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणे, तसेच देवस्थानचे उप कार्यकारी अधिकारी यांच्या आत्महत्येसारख्या अत्यंत गंभीर घटना शासनाच्या निदर्शनास आलेल्या आहेत. त्यानंतर हे विश्वस्त मंडळ बरखास्त करण्यात आले आणि पुढे शासनाच्या पुढाकाराने नवीन विश्वस्त मंडळ गठित केले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.

बोगस अॅप; आणि कोट्यवधींचा घोटाळा

आमदार विठ्ठल लंघे आणि आमदार सुरेश धस यांनी नकली ॲप तयार करून भाविकांकडून पूजेसाठी त्यावर पैसे घेतले जात असल्याचा प्रकारही सभागृहात उपस्थित केला होता. धस यांनी आरोप केला की या अ‍ॅपच्या माध्यमातून किमान 500 कोटींची रक्कम गोळा करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, चौकशी समितीच्या, कागदोपत्री दाखवलेल्या एकूण 2474 कर्मचाऱ्यांपैकी कोणाचे मस्टर सापडले नाही, त्यांचा हजेरीपटही नव्हता आणि कोणाची सही देखील नव्हती.  घोटाळेबाजांनी त्यांच्या कार्यकर्त्यांनाच बँक खाती उघडायला लावली होती. मंदिराच्या खात्यातून अस्तित्वात नसलेल्या कर्मचाऱ्यांना नियमितपणे पगार मिळत होता. पगाराची रक्कम प्रत्यक्षात कार्यकर्त्यांच्या खात्यात जात होती.

देवस्थान आतापर्यंत 250 ते 300 कर्मचाऱ्यांवर व्यवस्थित चालत होते. मात्र घोटाळेबाजांनी कागदोपत्री 2447 कर्मचारी नियुक्त केल्याचे दाखवले. हे सर्व कर्मचारी बोगस होते. देवस्थानच्या रुग्णालयात 327 कर्मचारी कार्यरत असल्याचे कागदोपत्री दाखवले होते. प्रत्यक्षात तपासणीत रुग्णालयात एकही रुग्ण नव्हता. 15 खाटा, 80 वैद्यकीय आणि 247 अकुशल कर्मचारी असे दाखवले असताना, प्रत्यक्षात केवळ 4 डॉक्टर आणि 9 कर्मचारी हजर होते. अस्तित्वात नसलेल्या रुग्णालयाच्या बागेच्या देखरेखीसाठी 80 कर्मचारी दाखवण्यात आले होते. अशा प्रकारे पैशांच्या अफरातफरीचा गोरख धंदा त्या ठिकाणी सुरू होता.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews