पुढील काही दिवसांसाठी राज्यातील पावसाचा जोर ओसरण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. काही दिवस पावसात खंड पडू शकतो. गेल्या दोन दिवसांपासून राज्याच्या बहुतांश भागात आकाश ढगांनी आच्छादलेले आहे. पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊसही पडताना दिसत आहे. मात्र, आगामी काही दिवसांत पावसामधून थोडा विसावा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. हवामान विभागाने नेमका काय अंदाज वर्तवला, ते जाणून घेऊ…
विदर्भ-मराठवाड्यात पावसाची काय स्थिती?
विदर्भाच्या पूर्व भागातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पावसाची तीव्रता कायम राहण्याची शक्यता आहे. नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.पश्चिम विदर्भातील जिल्ह्यांमध्ये पावसाला ब्रेक लागलेला दिसत आहे. एकूणच गेल्या आठवड्यात राज्यभर जोरदार पावसाचा अनुभव आला, मात्र आता पूर्व विदर्भातील काही भाग सोडले तर राज्यातील बहुतांश भागांत पावसाची कमी झालेली स्पष्टपणे जाणवत आहे. मराठवाड्यातही पावसाची जोरदार हजेरी सध्या कमी झाली आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यांमध्ये आकाश मुख्यतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे. स्थानिक हवामानाच्या बदलामुळे काही ठिकाणी हलक्या पावसाच्या सरी पडू शकतात.
उत्तर-पश्चिम महाराष्ट्रात पावसात खंड?
उत्तर महाराष्ट्रात सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये आकाश प्रामुख्याने ढगाळ राहण्याची शक्यता असून, काही निवडक भागांत हलक्या पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तिकडे पश्चिम महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यांत घाटमाथ्याचा भाग वगळता उर्वरीत भागात पावसाने पुर्णपणे विश्रांती दिली आहे. त्यामुळे सातारा, सांगली, कोल्हापुर आणि सोलापूरच्या मैदानी भागात पाऊस हलका ते तुरळक सरी असा असण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तविण्यात आली आहे.






