Soyabean Price: राज्यभरात सोयाबीनच्या दरात वाढ; आज कुठे अन् काय भाव मिळाला ?

Written by:Rohit Shinde
Published:
महाराष्ट्रातील बहुतांश बाजार समित्यांमध्ये आता सोयाबीनच्या दरामध्ये चांगलीच सुधारणा होताना दिसत आहे. दरामध्ये वाढ होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये काहीसे समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.
Soyabean Price: राज्यभरात सोयाबीनच्या दरात वाढ; आज कुठे अन् काय भाव मिळाला ?

सोयाबीन बाजारात सध्या दरांमध्ये मोठी चढ-उतार पाहायला मिळत आहे. नव्या हंगामातील आवक वाढत असताना काही बाजार समित्यांमध्ये दर वाढताना दिसत आहेत, तर काही ठिकाणी घसरण नोंदवली जात आहे. मात्र एकुणच राज्यातील बाजार समित्यांमध्ये सध्या दरामध्ये चांगली सुधारणा पाहायला मिळत आहे. आज बुधवार, 24 डिसेंबर रोजी राज्यभरातील बाजार समित्यांमध्ये दराची नेमकी काय स्थिती राहिली, कुठे आवक किती झाली ? या बाबी सविस्तर जाणून घेऊ.

राज्यभरात सोयाबीनच्या दरात सुधारणा

महाराष्ट्रात काही बाजारांत दर्जेदार सोयाबीनला चांगला दर मिळत असला तरी सर्वसाधारणपणे दर स्थिरावल्याचे चित्र आहे. 23 आणि 24 डिसेंबर 2025 रोजी झालेल्या व्यवहारांनुसार सोयाबीनचे दर किमान 2,500 रुपयांपासून ते कमाल 6,000 रुपयांपर्यंत नोंदवले गेले आहेत. 

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये सोयाबीनची मोठी आवक झाली. अमरावती बाजार समितीत लोकल सोयाबीनची तब्बल 5,790 क्विंटल आवक झाली असून येथे किमान 4,250 तर कमाल 4,500 रुपये दर मिळाला. लातूर बाजारात पिवळ्या सोयाबीनची 8,180 क्विंटल इतकी मोठी आवक नोंदवली गेली असून येथे सरासरी दर 4,900 रुपये इतका राहिला. जालना बाजारातही 6,130 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 5,000 रु नोंदवला गेला.

मराठवाड्यात परळी-वैजनाथ बाजारात 1,304 क्विंटल आवक झाली असून येथे सोयाबीनला 4,550 ते 4,741 रुपये दर मिळाला. माजलगाव,  नांदेड, औसा आणि कळंब (धाराशिव) आणि अहमपूर या बाजारांतही मोठ्या प्रमाणावर व्यवहार झाले. औसा बाजारात सरासरी 4,627 रुपये तर कळंब बाजारात 4,651 रु. सरासरी दर नोंदवण्यात आला. उत्तर महाराष्ट्रात लासलगाव-विंचूर, सिन्नर, पिंपळगाव (ब) आणि मनमाड या बाजारांमध्येही व्यवहार झाले. लासलगाव-विंचूर येथे 537 क्विंटल आवक असून सरासरी दर 4,711 रुपये राहिला. पिंपळगाव (ब) – पालखेड येथे हायब्रीड सोयाबीनला कमाल 4,780 रुपये तर सरासरी 4,730 रुपये दर मिळाला.

सोयाबीनच्या दरात अस्थिरता नेमकी कशामुळे?

महाराष्ट्रात सोयाबीनच्या दरात अलीकडे कमालीची अस्थिरता दिसून येत आहे. पावसाच्या अनियमिततेमुळे अनेक ठिकाणी शेतकऱ्यांचा माल भिजला असून त्यामुळे उत्पादनाची प्रत ढासळली आहे. खराब गुणवत्तेमुळे बाजार समित्यांत दर घसरत आहेत. त्यातच बाजारपेठांमध्ये होणारी अस्थिर आवक आणि व्यापाऱ्यांचा कमी प्रतिसाद यामुळे भावात चढ-उतार वाढले आहेत. काही दिवशी आवक जास्त असल्याने दर कमी होतात, तर आवक घटली की अचानक वाढतात. या अनिश्चित परिस्थितीमुळे शेतकरी अडचणीत आले असून स्थिर दर मिळण्यासाठी सरकारी हस्तक्षेप आणि खरेदी धोरणांची गरज प्रकर्षाने जाणवू लागली आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews