Marathi News

मराठा आरक्षणाचा लढा जरांगे विरुद्ध भाजपा मार्गावर, नेमकं काय घडतंय?

Written by:Smita Gangurde
Published:
कोणत्याही परिस्थितीत माघार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलीय, त्यामुळं आता भाजपानं हिंदू कार्ड बाहेर काढलंय. हिंदूंच्या सणांमध्ये खोडा घालण्याचं काम जरांगे पाटील करत असल्याची टीका केली जात आहे
मराठा आरक्षणाचा लढा जरांगे विरुद्ध भाजपा मार्गावर, नेमकं काय घडतंय?

मुंबई – मराठा आरक्षणासाठी एल्गार करत पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील मैदानात उतरले आहेत. ऐन गणेशोत्सवात आरक्षणासाठी मराठा वादळ घेून ते मुंबईकडे सरकत आहेत. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जरांगे पाटलांच्या निशाण्यावर आहेत.त्याच पार्श्वभूमीवर भाजपानंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या समर्थनार्थ मुंबई, नवी मुंबईत बॅनरबाजी केलीय

इतिहास शिव्यांना नव्हे तर कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो अशा भाषेत जरांगेंवर पलटवार करण्यात आलाय
या बॅनरवर भाजपा आमदार प्रविण दरेकर, प्रसाद लाड, निरंजन डावखरे आणि माथाडी नेते नरेंद्र पाटील यांची नाव आहेत.

भाजपाकडून काय बॅनरबाजी?

मनजो जरांगे पाटील मुंबईत येणार, हे आता जवळपास निश्चित झालं आहे. सरकारकडून शिष्टाईचे प्रयत्न अयश्वी होताना दिसतायेत. अशा स्थितीत भाजपाकडूनही मुख्यमंत्र्यांच्या समर्थनार्थ बॅनरबाजी करण्यात येतेय. या बॅनर्सवर इतिहास शिव्यांना लक्षात ठेवत नाही. इतिहास हा कर्तृत्ववाला लक्षात ठेवतो. मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण देणारे
ते आरक्षण उच्च न्यायालयात टिकवणारे नेतृ्त्व म्हणजे देवेंद्र फडणवीस, अशा आशयाचे बॅनर मुंबईत झळकताना दिसतायेत.

महायुतीला 51 टक्के मतं ही फडणवीसांवरील विश्वास – बावनकुळे

मराठा समाजाला सरसकट आरक्षण न मिळण्यासाठी जरांगे पाटील देवेंद्र फडणवीसांना जबाबदार धरताय. रविवारी बीडमध्ये झालेल्या मराठा समाजाची बैठकीत बोलताना जरांगेंनी मुख्यमंत्री फडणवीसांना आईवरून शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय
त्यामुळं आता भाजपा नेते सरसावले असून जरांगे पाटलांवर तुटून पडताय. महायुती सरकारला 51 टक्के मतं मिळाली हा देवेंद्र फडणवीसांवरील विश्वास आहे असं महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी जरागेंना सुनावलं

हिंदुत्वाचा मुद्दाही उपस्थित

ऐन गणेशोत्सवात जरांगे पाटील लाखो मराठा बांधवांसह मुंबईत धडकताय. कोणत्याही परिस्थितीत माघार नाही अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतलीय, त्यामुळं आता भाजपानं हिंदू कार्ड बाहेर काढलंय. हिंदूंच्या सणांमध्ये खोडा घालण्याचं काम जरांगे पाटील करत असल्याची टीका केली जात आहे. तर आम्हीही हिंदूच आहोत, असं मनोज जरांगे पाटील सांगतायेत.

जरांगे पाटील यांच्या टार्गेटवर कोण?

दोन वर्षापूर्वी जेव्हा जरांगेंनी अंतरावली सराटीत मराठा आरक्षणासाठी पहिलं आमरण उपोषण सुरु केलं. मात्र त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर आंदोलन चिघळलं. तेव्हापासून जरांगेंच्या पाटलांच्या निशाण्यावर देवेंद्र फडणवीस आलेत. महायुतीच्या पहिल्या सरकारमध्ये ना एकनाथ शिंदेंवर टीका केली ना अजित पवारांवर. आताही जरांगे पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदेंवर कौतुकाचा वर्षाव करताय, त्यामुळं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जाणूनबुजून टार्गेट केलं जात असल्याचा आरोप भाजपा नेत्यांकडून होतोय

Follow Us :GoogleNews