Marathi News

प. बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान, हिंदू नरसंहाराविरोधात भाजपा बंगाली प्रकोष्ठचे धरणे आंदोलन

Written by:Astha Sutar
Published:
प. बंगालमधील ममता सरकारच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळत असून, तेथे राजरोसपणे हिंदूंवर अत्याचार होत आहेत.
प. बंगालमधील हिंसाचार हा संविधानाचा अपमान, हिंदू नरसंहाराविरोधात भाजपा बंगाली प्रकोष्ठचे धरणे आंदोलन

मुंबई – संविधानाच्या चौकटीत राहून, लोकशाही मुल्यांनुसार, नियमानुसार लागू केलेल्या वक्फ कायद्याचा विरोध करायचा तर लोकशाही पद्धतीने करा, कोर्टाचा दरवाजा ठोठावा. पण पश्चिम बंगालमध्ये धार्मिक भावना भडकावून हिंसा, हिंदूंची हत्या करत कायद्याला विरोध म्हणजे संविधानाचा अपमान आहे, असा घणाघात शनिवारी मुंबई भाजपाचे अध्यक्ष मंत्री आशीष शेलार यांनी शनिवारी केला. पश्चिम बंगालमधील हिंदू नरसंहारा विरोधात भारतीय जनता पार्टीच्या बंगाली प्रकोष्ठच्या वतीने प्रदेश कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी शेलार बोलत होते.

प. बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करा…

दरम्यान, प. बंगालमध्ये हिंदूंच्या रक्षणासाठी राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी भाजपा बंगाली प्रकोष्ठच्या वतीने यावेळी करण्यात आली. हिंदू एकजूट होताना दिसले की लगेच जाती भेद निर्माण करून वाद निर्माण करणाऱ्या नेत्यांत महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते ही सामील आहेत असे म्हणत ॲड. शेलार यांनी महाराष्ट्रातील एका ज्येष्ठ नेत्यावर नाव न घेता शरसंधान केले. ममता सरकार हिंदूंवर करत असलेल्या निर्घृण अत्याचाराविरोधात भाजपा उभी आहे. आतंकवादाला धर्म नसतो अस म्हणतात पण मग दहशतवादी हल्ल्यात एका विशिष्ट धर्माचे लोकच का असतात असा खरमरीत सवाल ही यावेळी ॲड. शेलार यांनी केला. पहलगाम हल्ल्यातील सर्व गुन्हेगारांना मोदी सरकार कडक शासन देईल यात शंकाच नाही. असा विश्वास शेलार यांनी व्यक्त केला.

ममता सरकार मुर्दाबाद…

यावेळी ‘ममता सरकार मुर्दाबाद…’, ‘ममता राजीनामा दो…’, राष्ट्रपती शासन लागू करो… अशा घोषणा देत नराधम ममता सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. मुर्शिदाबाद येथील हिंसाचारात आणि पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तिंना श्रद्धांजली म्हणून 2 मिनिटे मौन पाळण्यात आले. प. बंगालमधील ममता सरकारच्या लांगूलचालनाच्या राजकारणामुळे कट्टरतावादी शक्तींना प्रोत्साहन मिळत असून, तेथे राजरोसपणे हिंदूंवर अत्याचार होत आहेत. मुर्शिदाबाद घटना अत्यंत निंदनीय आहे. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करावी आणि हिंदूंना सुरक्षा पुरवण्यात यावी अशी मागणी शनिवारी भाजपा बंगाली प्रकोष्ठच्या वतीने करण्यात आली.

Astha Sutar
लेखकाबद्दल
Follow Us :GoogleNews