आरबीआयकडून रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय; कर्जदारांना ‘ईएमआय’मध्ये कोणताही दिलासा नाही!

Written by:Rohit Shinde
Published:
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीने आज रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे वाहन अथवा गृह कर्ज धारकांना कोणताही ठोस दिलासा मिळणार नाही.
आरबीआयकडून रेपो रेट ‘जैसे थे’ ठेवण्याचा निर्णय; कर्जदारांना ‘ईएमआय’मध्ये कोणताही दिलासा नाही!
भारतीय रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण समितीन आज रेपो रेटमध्ये कोणताही बदल न करण्याचा निर्णय घेतला आहे. आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सकाळी 10 वाजता या निर्णयाची घोषणा केली, त्यामुळे सर्वसामान्यांना कोणताही दिलासा मिळालेला नाही. आरबीआयचा रेपो रेट 5.50 टक्के इतका स्थिर आहे. थोडक्यात काय तर वाहन अथवा गृह कर्ज धारकांचे कर्जाचे हप्ते जैसे थे राहणार आहेत. एकीकडे रेपो रेटमध्ये कपात होऊन कर्जदारांना दिलासा मिळेल, असे सांगितले जात होते. परंतु, तसा निर्णय आरबीआयकडून घेण्यात आलेला नाही.

कर्जदारांना कोणताही ठोस दिलासा नाही!

जूनमध्ये झालेल्या पतधोरण समितीच्या बैठकीत आरबीआयने प्रमुख व्याजदरात 50 बेसिस पॉइंट्सची (0.50%) कपात करण्याची घोषणा केली होती. मात्र, यावेळच्या बैठकीत रेपो रेटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही, तो 5.50 टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. त्यामुळे एकंदरीत या निमित्ताने कर्जदारांना कोणताही ठोस दिलासा मिळालेला नाही. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतावर लावलेल्या टॅरिफ (आयात शुल्क) धोरणांमुळे जागतिक अर्थव्यवस्थेत काही प्रमाणात अनिश्चितता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत, आरबीआयने रेपो रेट स्थिर ठेवून देशांतर्गत आर्थिक स्थैर्य राखण्याचा प्रयत्न केल्याचे दिसून येते. जीडीपी वाढीच्या दृष्टिकोनातूनही या निर्णयाकडे पाहिले जात आहे.

रेपो रेट आणि कर्जाच्या हप्त्यांचा संबंध

रेपो रेट हा रिझर्व्ह बँकेकडून (RBI) ठरवला जाणारा तो दर आहे, ज्यावर व्यावसायिक बँका रिझर्व्ह बँकेकडून अल्पकालीन कर्ज घेतात. जेव्हा रिझर्व्ह बँक रेपो रेट वाढवते, तेव्हा बँकांचे कर्ज घेण्याचे खर्च वाढते आणि त्यामुळे बँका ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या कर्जांवरील व्याजदर वाढवतात. परिणामी, गृहकर्ज, वाहन कर्ज किंवा वैयक्तिक कर्जांचे मासिक हप्ते (EMI) वाढतात.उलट परिस्थितीत, जर रेपो रेट कमी झाला तर बँकांचा खर्च कमी होतो आणि त्या ग्राहकांना कमी व्याजदराने कर्ज देऊ शकतात. त्यामुळे कर्जाचे हप्ते कमी होतात. त्यामुळे रेपो रेटचा थेट परिणाम सामान्य नागरिकांच्या आर्थिक व्यवस्थेवर होतो.

घर खरेदी करणारे, व्यवसाय सुरू करणारे किंवा शिक्षणासाठी कर्ज घेणारे नागरिक रेपो रेटकडे लक्ष ठेवतात, कारण यामुळे त्यांची मासिक आर्थिक गणितं बदलू शकतात. विशेषतः फ्लोटिंग व्याजदर असलेल्या कर्जांवर रेपो रेटच्या बदलांचा त्वरित प्रभाव पडतो. त्यामुळे RBI कडून जाहीर होणाऱ्या दरपथकांवर बाजार, वित्तीय संस्था आणि सर्वसामान्य नागरिकांचे लक्ष असते. रेपो रेट आणि कर्जहप्ते यांचा हा परस्पर संबंध देशातील आर्थिक गतिशीलतेसाठी महत्त्वाचा आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews