रेल्वेने प्रवास करणाऱ्या सामान्य प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी, भारतीय रेल्वे लवकरच ९ वेगवेगळ्या मार्गांवर ९ नवीन अमृत भारत एक्सप्रेस गाड्या सुरू करणार आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मंगळवारी ही माहिती दिली. केंद्रीय मंत्र्यांनी या नवीन गाड्या कोणत्या ९ मार्गांवर धावतील याची माहिती दिली आहे.

या नवीन गाड्या पश्चिम बंगाल, आसाम, बिहार, उत्तर प्रदेश, दिल्ली, हरियाणा, ओडिशा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, महाराष्ट्र, तामिळनाडू येथील कोट्यवधी सामान्य प्रवाशांना गाड्यांमध्ये किफायतशीर प्रवास तर देतीलच, शिवाय त्यांचा प्रवास सोयीस्कर आणि आरामदायीही होईल.

या मार्गांवर धावणार गाड्या

  1. गुवाहाटी (कामाख्या) – रोहतक अमृत भारत एक्सप्रेस

  2. डिब्रुगढ – लखनौ (गोमती नगर) अमृत भारत एक्सप्रेस

  3. न्यू जलपाईगुडी – नागरकोइल अमृत भारत एक्सप्रेस

  4. न्यू जलपाईगुडी – तिरुचिरापल्ली अमृत भारत एक्सप्रेस

  5. अलीपुरद्वार – एसएमव्हीटी बेंगळुरू अमृत भारत एक्सप्रेस

  6. अलीपुरद्वार – मुंबई (पनवेल) अमृत भारत एक्सप्रेस

  7. कोलकाता (संतरागाछी) – तांबरम अमृत भारत एक्सप्रेस

  8. कोलकाता (हावडा) – आनंद विहार टर्मिनल अमृत भारत एक्सप्रेस

  9. कोलकाता (सियालदह) – बनारस अमृत भारत एक्सप्रेस

अमृत ​​भारत एक्सप्रेसमध्ये १००० किमी प्रवासाचे भाडे ५०० रुपये 

अमृत काळाची खास भेट म्हणून सुरू करण्यात आलेल्या अमृत भारत एक्सप्रेस गाड्या विशेषतः नॉन-एसी स्लीपर वर्गातून लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी डिझाइन करण्यात आल्या आहेत.

अमृत भारत एक्सप्रेस ट्रेनचे भाडे साधारणतः प्रति १००० किलोमीटर सुमारे ५०० रुपये इतके आहे. कमी आणि मध्यम अंतराच्या प्रवासासाठी त्यानुसार भाडे कमी ठेवण्यात आले आहे. या गाड्या भौगोलिक परिस्थिती आणि संधींच्या अभावामुळे अनेकदा मुख्य प्रवाहापासून दूर राहणाऱ्या भागांना जोडण्याचे काम करतात.

डिसेंबर २०२३ मध्ये सुरू झाल्यानंतर सध्या देशभरात ३० अमृत भारत एक्सप्रेस गाड्या चालू आहेत. येत्या एका आठवड्यात आणखी ९ नवीन गाड्या सुरू करण्यात येणार असून, त्यामुळे अमृत भारत एक्सप्रेस गाड्यांची एकूण संख्या ३९ वर पोहोचणार आहे.