Marathi News

Tamilnadu stampede: मृतांचा आकडा वाढला; अभिनेता विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाखांची मदत

Written by:Rohit Shinde
Last Updated:
तामिळनाडू चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांचा आकडा 40 च्या पार गेल्याची माहिती समोर येत आहे. अनेक रूग्ण गंभीर जखमी असून हा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. शिवाय अभिनेता विजयकडून आता मृतांच्या कुटुंबियांनी मदतीची घोषणा करण्यात आली आहे.
Tamilnadu stampede: मृतांचा आकडा वाढला; अभिनेता विजयकडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाखांची मदत

तामिळनाडूतून एक मोठी बातमी समोर येत आहे. सुपरस्टार अभिनेता आणि टीव्हीके पक्षाचे प्रमुख विजय यांनी मोठी घोषणा करत करूरमधील चेंगराचेंगरी प्रकरणात मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. 27  सप्टेंबर रोजी तमिळनाडूमधील करुर येथे विजय यांच्या टीव्हीके पक्षाकडून रॅली आयोजित करण्यात आली होती मात्र या रॅलीत अचानक चेंगराचेंगरी झाल्याने 39 जणांचा मृत्यू झाला होता तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे.

मृतांच्या कुटुंबीयांना 20 लाखांची मदत

टीव्हीके पक्षाच्या रॅलीतील विजयच्या भाषणादरम्यान अनेक लोक बेशुद्ध पडू लागले आणि रॅलीच्या ठिकाणी चेंगराचेंगरी झाली. या दुर्घटनेत आतापर्यंत 39 जणांचा मृत्यू झाला आहे तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती देखील व्यक्त केली जात आहे. अशा परिस्थितीत आता अभिनेता विजय कडून मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 20 लाखांची मदत देण्याची घोषणा करण्यात आली आहे. तर दुसरीकडे जखमींना प्रत्येकी 2 लाख रुपये देण्याची विजने घोषणा केली आहे. तमिळनाडूचे मुख्यमंत्री यांनी देखील शनिवारी मृतांच्या कुटुंबियांना 10 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली होती.

अपेक्षेपेक्षा अधिक लोक जमले; घात झाला

आयोजकांनी करूरमध्ये मोठ्या मैदानाची विनंती केली होती आणि सुमारे 10,000 लोकांची अपेक्षा होती, परंतु सुमारे 27,000 लोक जमले होते. विजय ज्या प्रचारस्थळी जनतेला संबोधित करणार होते त्या ठिकाणी 500 हून अधिक पोलिस तैनात करण्यात आले होते. त्यामुळे अधिकची झालेली गर्दी हेच या दुर्घटनेचे कारण सांगितले जात आहे.

मुख्यमंत्री स्टॅलिन यांच्याकडून घटनेची दखल

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी करुर येथे घडलेल्या या घटनेवर चिंता व्यक्त केली. त्यांनी ट्वीट केले की, माजी मंत्री व्ही. सेंथिलबालाजी, आरोग्य मंत्री मा. सुब्रमण्यम आणि जिल्हाधिकाऱ्यांना बेशुद्ध पडलेल्या आणि रुग्णालयात दाखल झालेल्यांना त्वरित वैद्यकीय मदत देण्याचे निर्देश दिले आहेत. त्यांनी तिरुचिरापल्लीचे मंत्री अनबिल महेश यांना मदत कार्यात सर्वतोपरी मदत करण्याचे आदेश देखील दिले. मुख्यमंत्र्यांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी एडीजीपींना जलद कारवाई करण्यास सांगितले. त्यांनी जनतेला डॉक्टर आणि पोलिसांना सहकार्य करण्याचे आवाहन केले.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews