Marathi News

उत्तर भारतात अवकाळी पावसाचे थैमान, इतक्या लोकांचा झाला मृत्यू…महाराष्ट्राला इशारा!

Written by:Rohit Shinde
Published:
उत्तर भारतातील बहुतांश भागात अवकाळीने थैमान घातल्याचे चित्र आहे. झालेल्या तुफान अवकाळी पावसामुळे दिल्ली परिसरात 7 लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

नवी दिल्ली: उत्तर भारतातील बहुतांश पट्ट्याला अवकाळी पावसाने झोडपून काढल्याची माहिती समोर येत आहे. एकीकडे तीव्र उन्हाळा आणि दुसरीकडे अवकाळी पाऊस असे विरोधाभासी वातावरण सध्या तयार झाले आहे. राजधानी दिल्ली शहराला देखील अवकाळी पावसाने चांगलंच झोडपून काढल्याची माहिती समोर येत आहे.

7 लोकांनी गमावला जीव

उत्तर भारतात 02, 03 मे 2025 रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे दिल्ली आणि आसपासच्या भागात मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या पावसामुळे 7 जणांचा मृत्यू झाला असून, अनेक ठिकाणी झाडे पडली, वाहतूक विस्कळीत झाली आणि पाणी साचले. दिल्लीतील रोहिणी भागात पावसामुळे पाणी साचल्याने 7 वर्षाच्या मुलाचा बुडून मृत्यू झाला. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.

दिल्लीतील काही भागांमध्ये 77 मिमी (3.3 इंच) पाऊस पडला, जो 1901 नंतरच्या मे महिन्यातील दुसऱ्या सर्वाधिक पावसाच्या प्रमाणात आहे. पंजाब, राजस्थान, हिमाचल प्रदेश आणि उत्तर प्रदेशमध्येही या पावसामुळे घरांची छतं कोसळली, पूरस्थिती निर्माण झाली आणि अनेक रस्ते बंद झाले. हिमाचल प्रदेशात 288 रस्ते बंद झाले असून, तीन जणांचा मृत्यू झाला आहे. या काळात विज कोसळल्याने देखील काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

भारत सरकारने या आपत्तीच्या तातडीने मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) आणि स्थानिक प्रशासनाला सक्रिय केले आहे. दरम्यान, भारतीय हवामान विभागाने पुढील काही दिवसांत उत्तर भारतात अधिक पावसाची शक्यता वर्तवली आहे. नागरिकांना सुरक्षित राहण्याचे आणि स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्राला देखील अवकाळीचा धोका

विदर्भ ते केरळ या पट्ट्यात सध्या कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. अशी परिस्थिती निर्माण झाल्याने विदर्भातील नागपूर, वर्धा, यवतमाळ, अमरावती, भंडारा, गोंदीया आणि गडचिरोली या भागाला अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरातील नागरिकांना सतर्कतेचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच एकीकडे उष्णतेने हैराण झालेल्या नागरिकांना या पावसामुळे काही प्रमाणात दिलासा देखील मिळणार आहे.

अवकाळी पावसात अशी घ्या जीवाची काळजी

अवकाळी पावसात आरोग्य आणि सुरक्षिततेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. घराबाहेर पडताना पावसाळी छत्री किंवा रेनकोट वापरा. विजेच्या कडकडाटात उघड्यावर राहू नका, झाडांच्या खाली थांबणे टाळा. ओले कपडे लगेच बदलावेत, अन्यथा सर्दी-खोकल्यासारखे त्रास होऊ शकतात. रस्त्यांवर पाणी साचल्यास त्या भागांपासून दूर राहा – विजेचे धक्के बसण्याचा धोका असतो. स्वच्छ आणि गरम अन्न खा, पावसाळी हवामानात अन्न विषबाधेचा धोका वाढतो. मोबाइल आणि अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे कोरडी ठेवा. वृद्ध, लहान मुले आणि गर्भवती महिलांनी विशेष काळजी घ्यावी. स्थानिक प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा व सुरक्षित राहा.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews