नवी दिल्ली- पहलगाम हल्ल्यानंतर भारतीय सैन्यानं पाकिस्तान आणि पाकिस्तानात लपून कारवाया करणाऱ्या दहशतवाद्यांना चांगलीच अद्दल घडवली आहे. निष्पाप पर्यटक आणि भारतीयांना टार्गेट करण्याच्या दहशतवाद्यांच्या कृत्याला भारतानं चपराक दिलीय. पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील ९ दहशतवादी अड्डे ऑपरेशन सिंदूरमध्ये उद्ध्वस्त करण्यात आले.
आगळीक करणाऱ्या पाकिस्तानी सैन्यालाही अद्दल घडवली आहे. पाकिस्तानातील एयर बेसवर हल्ले करताना २० टक्के नुकसान करण्यात आलंय. १०० हून अधिक दहशतवादी आणि पाकिस्तानी सैन्याचे ४५ अधिकारी, जवान या कारवाईत मारण्यात आलेत. शस्त्रबंदीची घोषणा केल्यानंतरही ड्रोन हल्ले करणाऱअया पाकिस्तानी सैन्याना धडा शिकवण्यात आलाय.
पाकिस्तानची आणखी कोंडी करणार
या सगळ्यात गुडघ्यावर आलेल्या पाकिस्तानकडून सिंधू जल कराराचा पुनर्विचार करण्याची गयावया आता भारतापुढे करण्यात येतेय. या परिस्थितीत पाकिस्तानची आणखी कोंडी करण्याचा भारताचा प्रयत्न दिसतोय. दहशतवाद्यांचं आश्रयस्थान असणाऱअया पाकिस्तानला जागतिक पातळीवर एकटं पाडण्याचा भारताचा प्रयत्न आहे. याचाच एक भाग म्हणून पाकिस्तानात लपून बसलेल्या तीन मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना भारताच्या हवाली करण्याची मागणी करण्यात येणार आहे.
भारताला हवेत हाफीज, मसूद आणि दाऊद
भारतावर गेल्या दोन दशकांपासून हल्ले करणारे हाफिज सईद, मसूद अझहर आणि दाऊद इब्राहिम हे पाकि्तानात मोकाट आहेत. ऑपरेशन सिंदूरनंतर आता या तिघांसह मोस्ट वॉन्टेड दहशतवादी भआरताला सोपवावेत, असं पत्र भारताच्या वतीनं पाकिस्तान सरकारला पाठवण्यात येणार आहे.
हाफिज सईद दा २६-११ मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाईंड मानण्यात येतो. मसूद अझहर हा जैश ए मोहम्मदचा म्होरक्या आहे. बहावलपूरमध्ये जैशच्या मुख्यालयावर करण्यात आलेल्या हल्ल्यात मसूदचे १० नातेवाईक ठार झाले आहेत. तर दाऊद इब्राहिम हा १९९३ साली मुंबईतील बॉम्बस्फोटाचा मुख्य सूत्रधार आहेच त्यासोबत इतरही गुन्हेगारी कारवायांसाठी भारताला तो हवा आहे.
पाकच्या विश्वासहर्ततेवर कोंडीचा डाव
सीमापार दहशतवाद थांबणार नाही, पीओके भारतात येणार नाही तोपर्यंत पाकशी चर्चा होणार नाही, अशी ठाम भूमिका केंद्र सरकारनं घेतलेली आहे. जागतिक पातळीवर नाचक्की झालेल्या पाकिस्तानला सिंधू जल कराराच्या स्थगितीनं आणखी मोठा झटका दिलाय. अशा स्थितीत विश्वासहर्तता सिद्ध करायची असेल तर पाकिस्तानला काही पावलं उचलावी लागतील. त्यासाठी काही दहशतवाद्यांचं प्रत्यार्पण पाकिस्तानला करावं लागणार हे निश्चित. सद्य स्थितीत या तीन दहशतवाद्यांसह आणि काही दहशतवाद्यांच्या नावांसाठी भारत आग्रही राहणार आहे. भारतीय तपास यंत्रणा जागतिक पातळीवर इंटरपोलद्वारे रेड कॉर्नर नोटीसचाही पाठपुरावा करत असल्याचं सांगण्यात येतंय.






