चेन्नई – ऑपरेशन सिंदूरमध्ये सरकारनं सैन्याला फ्री हँड दिला होता. आम्ही बुद्धिबळाप्रमाणे खेळत होते. शत्रूची पुढची चाल काय असेल याची आम्हाला काहीही कल्पना नव्हती. आणि आम्हीही पुढे काय करणार, याचीही माहिती नव्हती, असं भारतीय सैन्यदलाचे प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी सांगितलंय.
आम्ही बुद्धिबळाप्रमाणे चाली खेळत होतो – जनरल उपेंद्र द्विवेदी
आम्ही बुद्धिबळाप्रमाणे चाली खेळत होतो आणि शत्रूही बुद्धिबळाप्रमाणेच चाली खेळत होत्या, असं द्विवेदी म्हणालेत. कुठे आम्ही शत्रूला शह देत होतो आणि त्यांच्यावर मात करत होतो तर कुठे जीवितहानी होऊ नये म्हणून दोन पावलं मागे येत होतो, असंही ते म्हणालेत. ऑपरेशन सिंदू हे ग्रे झोन होतं असंही त्यांनी सांगितलंय. हे पारंपरिक युद्ध नव्हतं, असंही त्यांनी खुलेपणानं सांगितलं. आयआयटी मद्रासच्या अग्निशोध इंडियन आर्मी सिसर्च सेलच्या उद्घाटनावेळी ते बोलत होते.
ऑपरेशन सिंदूर हे दहशतवाद्यांविरोधात भारताच्या लढाईतील नवा अध्याय असल्याचही त्यांनी सांगितलंय. ऑपरेशन सिंदूर हे सुनियोजित, गुप्त माहितीच्या आधारावर असलेलं ऑपरेशन होतं, हे सांगताना हा एक सैद्धांतिक बदल असल्याचंही ते म्हणालेत.
25 एप्रिलला प्लॅनिंग, 29 एप्रिलला पंतप्रधानांची भेट
जनरल द्विवेदी म्हणाले की, 25 एप्रिलला उत्तर कमांडचा आम्ही दौरा केला. त्यावेळी ऑपरेशनचं प्लॅनिंग करण्यात आलं. या ऑपरेशनमध्ये 9 मधील 7 दहशतवादी तळ आम्ही उद्ध्वस्त केले. यात अनेक दहशतवादी मारले गेले.
29 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली होती, असंही त्यांनी सांगितलंय. ऑपरेशन सिंदूर हे एक छोटं नाव संपूर्ण देश कसा जोडतो, हे महत्त्वाचं आहे. असंही ते म्हणालेत. या नावानं संपूर्ण देश प्रेरित झाल्याचंही द्विवेदी म्हणालेत. त्यामुळेच ऑपरेशन सिंदूर थांबवल्यानंतर का थांबवण्यात आलं, असा प्रश्न उपस्थित होत असल्याचं द्विवेदी म्हणालेत. या प्रश्नावर जोरदार उत्तरंही दिली गेल्याचं त्यांनी सांगितलंय





