Marathi News

Nepal News : जेन झेड आंदोलकांनी नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांचा राजीनामा मागितला, म्हणाले.. आम्ही बसवलं, आता…

Written by:Smita Gangurde
Published:
आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्याविना मंत्रिमंडळात मंत्र्यांना स्थान देत असल्याचा आक्षेप जेन झेड आंदोलनकर्त्यांचा आहे.
Nepal News : जेन झेड आंदोलकांनी नेपाळच्या पंतप्रधान सुशीला कार्की यांचा राजीनामा मागितला, म्हणाले.. आम्ही बसवलं, आता…

काठमांडू – नेपाळमध्ये क्रांती घडवून सत्तापालट घडवून आणणाऱ्या जेन झेडच्या आंदोलकांनी पंतप्रधान सुशीला कार्की यांच्याकडे राजीनाम्याची मागणी केली आहे. मंत्रिमंडळ विस्तारावर जेन झेड आंदोलनकर्ते नाराज आहेत. रविवारी रात्री पंतप्रधान निवासस्थानाबाहेर आंदोलन आणि घोषणाबाजी करण्यात आली.

आंदोलनकर्त्यांशी चर्चा केल्याविना मंत्रिमंडळात मंत्र्यांना स्थान देत असल्याचा आक्षेप जेन झेड आंदोलनकर्त्यांचा आहे. या आंदोलनाचं नेतृत्व सुदान गुरुंग करत होते. त्यांनी इशारा देत सांगितलं आहे की, जर आम्ही पुन्हा रस्त्यावर उतरलो तर आम्हाला कुणीही रोखू शकणार नाही. ज्यांना आम्ही सत्ता दिली आहे, त्यांना आम्ही बाहेरही फेकून देऊ शकतो.

आंदोलनकर्त्यांचा काय आक्षेप?

आंदोलनकर्त्यांनी असा आरोप केला आहे की, ज्येष्ठ वकील ओमप्रकाश आर्यल हे सरकारमध्ये हस्तक्षेप करीत आहेत. आर्यल यांनी गृहमंत्री होण्याचा निर्णय घएतला आहे, असा आरोपही गुरुंग यांनी केला आहे. ओमप्रकाश आर्यल हे काठमांडूचे महापौर बालेन शाह यांचे नीकटवर्तीय मानले जातात. पंतप्रधान कार्की यांनी ओमप्रकाश कार्यल यांच्याकडे गृह आणि कायदा, रामेश्वर खनाल यांच्याकडे अर्थ तर कुलमान घिसिंग यांना ऊर्जामंत्री म्हणून नियुक्त केले आहे.

गुरुंग यांनी आंदोलनाची केली होती घोषणा

36 वर्षांच्या गुरुंग यांनी 8 सप्टेंबरला काठमांडूमध्ये मोठ्या प्रमाणात विरोधी आंदोलनाची घोषणा केली होती. गुरुंग हे होमी नेपाल नावाच्या एनजीओचे संस्थापक आहेत. 2015 साली स्थापन झालेली ही एनजीओ आपतकालीन स्थितीच्या वेळी आणि संकटाच्या वेळी मदत पोहचवण्यासाठी ओळखली जाते. भूकंप आणि पुरासारख्या स्थितीत या संघटनेचे सदस्य बचावकार्य, अन्न आणि पाण्याची व्यवस्था करतात.

या संघटनेनं सातत्यानं विद्यार्थी आणि प्रवासी नेपाळी नागरिकांच्या समस्यांना वाचा फोडलेली आहे. भुवनेश्वरमध्ये या वर्षात एका नेपाळी विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी या संघटनेनं आक्रमक भूमिका घेत याविरोधात आवाज उठवला होता. साधारणपणे ही संघटना राजकीय वादांपासून दूर असते, या संघटनेच्या इन्स्टा अकाऊंटवरही संघटनेच्या सामाजिक कामाबाबत जास्त माहिती आहे. अशा स्थितीत रस्त्यावर सत्ता परिवर्तानासाठी गुरुंग यांची घोषणा ही मोठं पाऊल मानण्यात येतंय.

शिक्षक भरती घोटाळ्याबाबत प्रश्न उपस्थित केल्यानंतर गुरुंग हे राजकीय वादात आले होते. योग्य उमेदवारांना नाकारुन राजकीय दबावानं शिक्षक भरती होत असल्याचा आरोप गुरुंग यांनी केला होता. या आरोपांनंतर त्यांच्यावर जीवघेणा हल्लाही झाला होता

Follow Us :GoogleNews