Narendra Modi: ‘…तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा,’ पंतप्रधान मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र

Written by:Rohit Shinde
Published:
बिहार, उत्तरप्रदेश निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस - भाजपातील कटूता शिगेला पोहोचली आहे. त्यात वक्फ सुधारणेनंतर आणखीच भर पडली. आता मोदींनी काँग्रेसवर मुस्लिमांच्या मुद्द्यावर हल्ला चढवला आहे.
Narendra Modi: ‘…तर काँग्रेसने मुस्लिम अध्यक्ष करावा,’ पंतप्रधान मोदींचं काँग्रेसवर टीकास्त्र

नवी दिल्ली: बिहार निवडणूक, वक्फ सुधारणा कायदा यामुळे भाजप आणि काँग्रेसमधील कटूता आता शिगेला पोहोचली आहे. काँग्रेस मुस्लिमांना आपल्या बाजून वळविण्यासाठी प्रचार करत असताना आता भाजपानेही तीव्र विरोधी भूमिका घेतल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींनीच आता काँग्रेसवर टीकेची तोफ डागली आहे. नरेंद्र मोदी आज हरियाणा दौऱ्यावर आहेत. सकाळी 10 वाजता त्यांनी हिसारमधील हरियाणाच्या पहिल्या विमानतळाचे उद्घाटन केले. येथून हिसार-अयोध्या विमान उड्डाणाला हिरवा झेंडा दाखवण्यात आला. त्यानंतर बोलताना मोदींनी काँग्रेसला घेरलं.

काय म्हणाले मोदी?

हिस्सार येथील सभेला संबोधित करताना मोदी म्हणाले की, , “काँग्रेस म्हणते की हे मुस्लिमांच्या हितासाठी अनेक काम केले गेले. मी विचारू इच्छितो की जर काँग्रेस पक्षाला मनापासून मुस्लिमांबद्दल थोडीशीही सहानुभूती असेल तर त्यांनी एका मुस्लिमाला त्यांच्या पक्षाचा अध्यक्ष बनवावे, परंतु त्यांचे नेते असे काहीही करणार नाहीत. त्यांना फक्त देशातील नागरिकांचे हक्क हिरावून घ्यायचे आहेत. आगामी निवडणुकांत 50 टक्के तिकिटे मुल्सिम उमेदवारांना काँग्रेसने दिली पाहिजेत, असंही मोदी म्हणाले.

काँग्रेसने संविधानाला मुठमाती दिल्याची टीका:

बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधत  पंतप्रधान म्हणाले, “काँग्रेसने बाबा साहेबांचे काय केले हे आपण कधीही विसरू नये. काँग्रेसने त्यांना दोनदा निवडणुकीत पराभूत करून त्यांचा अपमान केला. काँग्रेस संविधानाचा नाश करणारी बनली आहे. कर्नाटकच्या काँग्रेस सरकारने एससी, एसटी, ओबीसींचे पेन्शनमधील अधिकार हिसकावून घेतले आणि धर्माच्या आधारावर आरक्षण दिले.”

वक्फ सुधारणा विधेयकाचे कायद्यात रूपांतर झाल्यापासून देशामध्य मुस्लिम समाजात काहीशी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. उत्तर प्रदेश, बिहार, पश्चिम बंगालमधील मुस्लिम मतदारांची नाराजी लक्षात घेत काँग्रेसने त्यांची बाजू घेण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते. भाजपाला अनेकदा निशाणा बनवलं गेलं. हे मुद्दे लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आता काँग्रेसला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. काँग्रेसची मुस्लिम मतदारांच्या बाजूने झुकत्या भूमिकेची मोदींनी चिरफाड केली.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews