शिवसेनेचे संगमनेर येथील आमदार अमोल खताळ यांच्यावर गुरूवार सायंकाळी हल्ला झाला. एका तरूणाने त्यांच्याशी हात मिळवण्याचा बहाणा करून त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी त्या तरूणास ताब्यात घेतलं आहे. खरंतर आता या घटनेमुळे संगमनेर मतदारसंघात अनेक तर्कवितर्क सध्या लढविले जात आहे. अशा परिस्थितीत आता या प्रकरणावर राधाकृष्ण विखे-पाटलांनी महत्वपूर्ण प्रतिक्रिया दिली आहे. शिवाय त्यांना थेट इशाराच या निमित्ताने दिला आहे.
नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे-पाटील?
पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी या प्रकरणावर बोलताना या हल्ल्याचा सर्वप्रथम आपण निषेध करतो, असे सांगितले. संगमनेरमध्ये जर अशाप्रकारे महायुतीच्या आमदार आणि कार्यकर्त्यांवर हल्ले होत असतील, तर महायुतीचे कार्यकर्ते देखील त्याच भाषेत उत्तर देतील, अशी आक्रमक प्रतिक्रिया विखे पाटील यांनी दिली आहे.
अमोल खताळांचे बाळासाहेब थोरातांवर आरोप
दरम्यान गेल्या काही दिवसापूर्वी एका सप्ताहच्या कार्यक्रमातून हभप भंडारे महाराज आणि बाळासाहेब थोरात यांच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झाले होते. त्यानंतर भंडारे यांची बाजू लावून धरत आमदार खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली होती. थोरात हे वैफल्यग्रस्त झालेत. जनतेने त्यांच्या हातात खुळखुळा दिलाय, ते खेळत बसा, अशा शब्दांत आमदार अमोल खताळ यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर हल्लाबोल केला होता.
दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आभार प्रदर्शनासाठी संगमनेरला आले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे आणि आमदार खताळ यांनी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्यावर जोरदार टीका केली होती. त्यांनतर आज झालेल्या या घटनेमुळे या घटनेमागे काही राजकारण शिजतंय का? अशी चर्चा संगमनेरकरांमध्ये रंगली आहे.
घटनेवर सत्यजीत तांबेंचेही भाष्य
संगमनेर येथे माझे सहकारी, आमदार अमोल खताळ यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या प्रयत्नाचा मी तीव्र शब्दांत निषेध करतो. लोकप्रतिनिधीवर कोणत्याही कारणास्तव अशा प्रकारची घटना घडणे अत्यंत निंदनीय आहे. पोलिस प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने सखोल आणि निपक्ष चौकशी करून संपूर्ण सत्य जनतेसमोर आणावे, ही अपेक्षा.






