Marathi News

ईव्हीएमच्या संदर्भात निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठा बदल…

Written by:Rohit Shinde
Published:
ईव्हीएमच्या संदर्भात बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. नेमका हा निर्णय काय आहे, ते जाणून घेऊ...
ईव्हीएमच्या संदर्भात निवडणूक आयोगाची मोठी घोषणा; बिहार विधानसभा निवडणुकीच्या आधी मोठा बदल…

ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवरून अनेकदा वाद निर्माण होतात. काहींच्या मते ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित आणि पारदर्शक आहेत, तर काहींना त्यात फेरफार होऊ शकतो असे वाटते. निवडणुकीत पारदर्शकता आणि लोकशाहीवरील विश्वास टिकवण्यासाठी सतत चर्चासत्रे व चाचण्या होत आहेत. या वादामुळे लोकांमध्ये उत्सुकता वाढते. त्यामध्ये आता बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. नेमका हा निर्णय काय आहे, ते जाणून घेऊ…

ईव्हीएमवर उमेदवारांचा रंगीत फोटो बंधनकारक

बिहार विधानसभा निवडणुकांपासून ईव्हीएममध्ये उमेदवारांचे रंगीत फोटो दिसणार असल्याची माहिती भारतीय निवडणूक आयोगाने दिली आहे. समान नाव असणाऱ्या उमेदवारांमुळे अनेकदा मतदारांमध्ये गोंधळ होतो यावर उपाय म्हणून आता निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराचा रंगीत फोटो ईव्हीएमवर लावला जाईल, ज्यामुळे मतदारांना त्यांच्या पसंतीच्या उमेदवाराची योग्य ओळख पटवून मतदान करता येईल. असं निवडणूक आयोगाने म्हटले आहे. एकीकडे आयोगाच्या कारभारावर अनेकदा प्रश्नचिन्हे उपस्थित केली जात असताना हा निर्णय महत्वाचा ठरतो.

निवडणूक आयोगाचे इतर काही महत्वाचे बदल

याचबरोबर सर्व उमेदवारांची नावे आणि नोटा एकाच फॉन्टमध्ये आणि फॉन्ट आकारात छापले जातील जेणेकरून मतदारांना ते वाचणे सोपे होईल. निवडणूक आयोगाने ईव्हीएम मतपत्रिकांसाठी एक मानक वजन देखील निश्चित केले आहे. हे मतपत्रके 70 जीएसएम असतील. विधानसभा निवडणुकांसाठी विशेष गुलाबी कागद वापरला जाईल. निवडणूक आयोग आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसह हे बदल अंमलात आणत आहे. त्यानंतरच्या सर्व निवडणुकांमध्ये ही प्रक्रिया पाळली जाईल.

बिहार विधानसभा निवडणुकीचे रण तापले!

बिहार विधानसभा निवडणुकीचे रण तापले असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी आश्वासने, सभा, मोर्चे आणि प्रचारयात्रा सुरू आहेत. प्रमुख पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपाची मालिका सुरू असून जनता कोणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. तरुण, शेतकरी, महिला आणि गरीब मतदार हे निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याचे चित्र आहे. विकास, रोजगार, शिक्षण आणि कायदा-सुव्यवस्था हे मुख्य मुद्दे ठरत आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews