मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक भूमिका घेत आंदोलनाची घोषणा केली आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदान आणि मंत्रालयावर मोर्चा नेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मोर्चा २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता अंतरवाली सराटी येथून सुरू होणार असून, तीन दिवसांनंतर मुंबईत आझाद मैदान व शासन दरबारी अर्थात मंत्रालयावर मराठा समाजाचा आवाज पुन्हा एकदा बुलंद होणार आहे. जर आंदोलकांवर अन्याय झाला, तर गावागावातले मुख्य व दुय्यम रस्ते बंद करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मुंबईतील या आंदोलनासाठी मराठा समाजाची तायरी सुरू आहे. लाखोंच्या संख्येने या आंदोलनात आंदोलक सहभागी होतील. अशा परिस्थितीत मनोज जरांगे-पाटलांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे-पाटील?
“आम्ही शांततेत मुंबईला जाणार आणि शातंतेत मराठा आरक्षण घेणार, मराठा समाजावर आलेले संकट मोडून काढणार असं वक्तव्य मनोज जरांगे यांनी केलं. मराठा समाजाच्या सभेमध्ये डीजे वाजवू दिला नाही, पण यापुढे बीडमध्ये कुठेही डीजे वाजवू देणार नाही हे नक्की. सत्ता येत असते, ती बदलत असते हे लक्षात ठेवाठ असा इशारा मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना दिला. “आता ही शेवटची फाईट आहे, अशी मारायची की आरक्षण घेऊनच यायचं” असं मनोज जरांगे म्हणाले.
“बीडमध्ये आमच्या सभेमध्ये अडचणी निर्माण केल्या जातात, जरा थांबा, आम्ही मुंबईत येतोय. त्यावेळी काय करायचं ते करा असं थेट आव्हान मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलं. सरकारने जर मराठ्यांना आरक्षण दिलं, आमच्या मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ? इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळतो.” अशा शब्दांत मनोज जरांगे आपले मत मांडले.
ओबीसी कोट्यातून आरक्षणाची मागणी
मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मैदानात उतरले आहे. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, आगामी आंदोलन मुंबईतच होणार आहे. हे आंदोलन निर्णायक ठरणार असून, मराठा समाजाच्या विजयाचा गुलाल उधळायचाच आहे, असा ठाम निर्धार त्यांनी व्यक्त केलाय. मुंबईतील हे आंदोलन आता फक्त मागणीचं नाही, तर निर्णय घेण्यासाठीचं असेल, असे देखील त्यांनी म्हटले आहे.
ओबीसी कोट्यातून आरक्षणाच्या मागणीला आतापासूनच ओबीसी नेत्यांचा कडाडून विरोध असल्याचे पाहायला मिळते, छगन भुजबळ, लक्ष्मण हाके यांनी आधीच यासंदर्भात भूमिका मांडायला सुरू केली आहे.






