राज्यातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे शेतकरी व सामान्य नागरिकांचे अपरिमित नुकसान झालंय. ग्रामीण अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडून पडली आहे. शहरी भागांनाही याची झळ पोहोचली आहे. ह्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने आपत्ती निवारणाची काही महत्त्वपूर्ण कामे तातडीने हाती घ्यावीत, अशा सूचना पवारांनी केली आहे. आता सरकारी पातळीवर या सूचनांना अथवा शरद पवारांनी केलेल्या आवाहनला कसा प्रतिसाद मिळतो, ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
शरद पवारांच्या सरकारला सूचना
परतीच्या मान्सूनमुळे राज्यातील प्रचंड नुकसान झालंय. शेतकरी उद्धवस्त झालाय. त्यामुळे शेतकरी आता मदतीसाठी सरकारकडे डोळे लावून बसलाय. सत्ताधारी व विरोधी पक्षही शेतकऱ्यांच्या बांदावर जावून त्याला धीर देत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता सरकारकाला काही सूचना केल्या आहेत. त्यात पाच महत्त्वाच्या सूचना आहे.
पंचनामा सुरळीत करा
पंचनामे वेळेत उरकणे अशक्य आहे. पंचनाम्यांच्या आधारे नुकसानीचा अहवाल राज्यशासनास सादर केल्यानंतर नव्याने निदर्शनास आलेल्या नुकसानाची दखल घेतली जात नाही. उदा. अतीवृष्टीनंतर काही दिवसांनी ऊण पडल्यामुळे भिंती-छप्परांना भेगा जाऊन घरे व इतर वास्तू यांची पडझड होते. पाणी ओसरल्यानंतर पिके व पशूधन व इतर बाबींची हानी निदर्शनास येते. अशा नुकसानीचे देखील पंचनामे होऊन आपदग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी.
पुनरूज्जीवन कार्यक्रम आराखडा
शेतकरी व सामान्य जनता आपत्तीने कोलमडून गेली असल्याने ह्या नुकसान भरपाई सोबतच पुनरूज्जीवन कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा. ह्यात पिकांच्या पुनर्पेरणी व पुनर्लागवडीसाठी विशेष मदत , फळबागांच्या पुनरूज्जीवनासाठी विशेष मदत यांचा समावेश असाव. वाहून गेलेली किंवा नापिक झालेली जमीन सुधारण्यासाठी विशेष आराखडा तयार करावा.
साहित्य वाटपाचा कार्यक्रम
अतिवृष्टी आणि पूराने नागरीकांचे संसारपयोगी साहित्य (भांडी, कपडालत्ता, फर्निचर वगैरे) नष्ट झालेत. शालेय साहित्य, चारा व शेतीची साधने, व्यवसायिक साहित्य यांची नासधूस झाली आहे. ह्या जंगम वस्तूंचा देखील पुरवठा करण्याचे नियोजन करावे व त्या वेळेत पुरवण्यात याव्यात.
शेतकरी हिताचे निर्णय
पीक विमा योजनेतील पात्रतेचे निकष शिथील करावेत, जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना विमा लाभ मिळेल. खाजगी विमा कंपन्यांकडून टाळाटाळ व दिरंगाई होणार नाही, याकडे सरकारने लक्ष द्यावे. वित्तीय संस्थांकडून कर्जदार शेतकरी व व्यवसायिक यांच्याकडून होणारी वसूली तात्काळ थांबवावी.
पुन्हा उभे राहू, शरद पवारांना विश्वास
आपत्तीग्रस्तांना मानसिक धक्क्यातून सावरण्यासाठी समुपदेशन शिबिरे आयोजित करावीत. बाधित व्यक्ती कोणत्याही परिस्थितीत टोकाचे पाऊल उचलणार नाहीत, याकडे सत्वर लक्ष द्यावे. ह्या अभुतपूर्व संकटात शासकीय यंत्रणा झोकून देऊन काम करत आहे, जनतेने धीराने घ्यावे. यापूर्वीही अशा संकटांतून मार्ग काढून आपण उभे राहिलो आहोत. तसे यावेळी ही पुन्हा उभे राहू, याचा मला विश्वास आहे, असे पवार यांनी म्हटलंय. त्यामुळे ज्येष्ठ नेते शरद पवारांनी दिलेल्या या सूचनांची अंमलबजावणी सरकार करते का ते पाहणे महत्वाचे ठरणार आहे.






