Marathi News

आजपासून आयपीएलचे सामने पुन्हा सुरू ; बंगळुरू आणि कोलकाता भिडणार!

Written by:Rohit Shinde
Last Updated:
आयपीएलचा 58 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता क्नाईट रायडर्स या संघांमध्ये खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगेल.
आजपासून आयपीएलचे सामने पुन्हा सुरू ; बंगळुरू आणि कोलकाता भिडणार!

17 मे पासून आयपीएल पुन्हा सुरू होत आहे, आणि क्रिकेटप्रेमींमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सध्या प्लेऑफच्या जवळ येत असल्याने प्रत्येक सामना अत्यंत महत्त्वाचा ठरत आहे. अनेक संघ अंतिम चारमध्ये स्थान मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. या नव्या टप्प्यात संघांची रणनिती अधिक आक्रमक व चोख दिसेल अशी अपेक्षा आहे. काही संघांनी आधीच आपले स्थान जवळपास निश्चित केले आहे, तर काहींसाठी प्रत्येक सामना “करो अथवा मरो” प्रकारचा ठरणार आहे.

बंगळुरू आणि कोलकाता भिडणार

आयपीएलचा 58 वा सामना आज रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता क्नाईट रायडर्स या संघांमध्ये खेळला जात आहे. बंगळुरूच्या एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर आज संध्याकाळी 7.30 वाजता हा सामना रंगेल. आरसीबीच्या दृष्टीने हा सामना अत्यंत महत्वाचा आहे. कारण, आरसीबीला आपले प्ले ऑफ्सचे तिकीट पक्के करायचे आहे. आतापर्यंत खेळलेल्या 11 सामन्यांपैकी 8 सामन्यांत विजय मिळवत बंगळुरू गुणतालिकेत दुसऱ्या स्थानावर आहे. संघाकडे 16 गुण असून नेट रन रेट 0.482 आहे.

दुसरीकडे कोलकाता संघाला या सीझनमध्ये चमकदार कामगिरी करता आलेली नाही. संघाने आतापर्यंत 12 सामने खेळले असून पैकी 6 सामन्यांमध्ये विजय मिळविता आला आहे. संघाकडे 11 गुण आहेत. अनिर्णित सामन्याचा एक गुण केकेआरला मिळाला होता. संघाचा नेट रन रेट देखील 0.193 इतका आहे. क्रिकेट जाणकारांच्या मते आजचा सामना आरसीबी संघ जिंकेल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आज आरसीबी आपला प्ले ऑफ्सचा मार्ग मोकळा करणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

गुणतालिकेची काय स्थिती?

1.   गुजरात टायटन्स

2.   रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

3.   पंजाब किंग्स

4.   मुंबई इंडियन्स

5.   दिल्ली कॅपिटल्स

6.   कोलकाता क्नाईट रायडर्स

7.   लखनऊ सुपर जायंट्स

8.   सनरायजर्स हैदराबाद (आयपीएलमधून बाहेर)

9.   राजस्थान रॉयल्स (आयपीएलमधून बाहेर)

10.  चेन्नई सुपर किंग्स (आयपीएलमधून बाहेर)

नव्या खेळाडूंना संधी मिळणार

युवा आणि नव्याने संधी मिळणाऱ्या खेळाडूंच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. काही युवा खेळाडूंनी प्रभावी खेळ करत आपली छाप सोडली आहे. कर्णधारांची रणनीती, बॉलरची अचूकता आणि फलंदाजांची फटकेबाजी यावरच आता संघाचे भवितव्य ठरणार आहे. प्रेक्षकही मोठ्या प्रमाणावर स्टेडियममध्ये हजेरी लावत आहेत, तसेच डिजिटल प्लॅटफॉर्मवर देखील सामने पाहण्याचा क्रेझ प्रचंड वाढला आहे. या दुसऱ्या टप्प्यात पावसाचेही थोडेसे संकट असू शकते, पण आयोजकांनी तयारी पूर्ण केली आहे. दररोज रंगणारे थरारक सामने, बदलते गुणतालिका आणि संभाव्य अंतिम फेरीचे अंदाज यामुळे आयपीएलचा रंग अजूनच गडद होणार आहे. 17 मेपासून सुरु होणाऱ्या या टप्प्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews