बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि त्यांची पत्नी सुनीता आहुजा नेहमीच त्यांच्या स्पष्टवक्तेपणामुळे चर्चेत असतात. पण या वेळी सुनीताच्या एका वक्तव्याने असा वाद निर्माण केला की स्वतः गोविंदालाच सार्वजनिकरित्या हात जोडून माफी मागावी लागली.अलीकडेच अभिनेत्री सुनीता आहुजा अभिनेता पारस छाबड्याच्या पॉडकास्टमध्ये सहभागी झाल्या होत्या. या मुलाखतीदरम्यान त्यांनी आपल्या घरातील पंडित आणि ज्योतिष यांच्याबद्दल बोलताना काही वक्तव्ये केली.

काय आहे विषय –

सुनीता आहुजा यांनी सांगितले की गोविंदा आपल्या पंडितांवर लाखो रुपये खर्च करतात. काही वेळा ते पूजा-पाठासाठी दोन लाख रुपयांपर्यंत देतात. सुनीता म्हणाल्या, “हे पंडित फक्त पूजा करायला सांगतात, पण त्याचा काही उपयोग होत नाही. मी स्वतः पूजा करते, कारण मला वाटतं की भगवान तेव्हाच प्रसन्न होतो जेव्हा आपण स्वतःच्या हातांनी पूजा करतो.त्याचबरोबर त्यांनी गोविंदाच्या मित्रमंडळी आणि टीमबद्दलही टीका केली. त्या म्हणाल्या, “ज्या मंडळीत गोविंदा बसतात त्यात अनेक लोक मूर्ख आहेत. ते लेखक कमी आणि मूर्ख जास्त आहेत. हे लोक गोविंदाला चुकीचे सल्ले देतात. मी मात्र सत्य बोलते, म्हणूनच त्यांना मी आवडत नाही. सुनीताच्या या विधानानंतर सोशल मीडियावर मोठा वाद निर्माण झाला. अनेकांनी हे वक्तव्य धार्मिक भावना दुखावणारे असल्याचे म्हटले. प्रकरण बळावल्याने शेवटी स्वतः गोविंदाला पुढे येऊन माफी मागावी लागली.

गोविंदाचे कौतुक –

गोविंदाने एका लाईव्ह व्हिडिओद्वारे प्रतिक्रिया देताना सांगितले, “माझ्या घरातील पंडित आदरणीय मुकेश शुक्ला जी अत्यंत विद्वान, प्रामाणिक आणि गुणी आहेत. आमचे कुटुंब नेहमीच त्यांच्याशी जोडलेले आहे. माझ्या पत्‍नीने त्यांच्या विषयी जे काही अपशब्द वापरले, त्याबद्दल मी मनापासून क्षमा मागतो.ते पुढे म्हणाले, “पंडितजी आमच्यासोबत अनेक कठीण प्रसंगी उभे राहिले आहेत. त्यांचा आणि त्यांच्या कुटुंबाचा मला मनापासून आदर आहे. त्यांच्या विषयी जे काही बोलले गेले, ते माझे मत नाही आणि मी त्याचे खंडन करतो. या संपूर्ण घटनेनंतर सोशल मीडियावर गोविंदाच्या संयमाचे कौतुक होत आहे. मात्र सुनीताच्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा गोविंदा दाम्पत्य वादाच्या भोवऱ्यात अडकल्याचे दिसत आहे. आता या प्रकरणावर पंडित मुकेश शुक्ला किंवा त्यांच्या मंडळींकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे उत्सुकतेचे ठरेल.