केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया प्रोग्रामला १० वर्षे पूर्ण झाली आहेत. २०१५ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली १ जुलैला हा कार्यक्रम सुरू करण्यात आला होता. डिजिटल इंडियाच्या या दशकपूर्ण यशाच्या निमित्ताने केंद्र सरकारने देशवासीयांसाठी एक खास स्पर्धा ‘A Decade of Digital India – Reel Contest’ सुरू केली आहे. ही स्पर्धा १ जुलैपासून सुरु झाली असून १ ऑगस्टपर्यंत चालणार आहे.

स्पर्धेचे स्वरूप आणि पुरस्कार

या स्पर्धेत सहभागी होणाऱ्यांना त्यांच्या डिजिटल इंडिया अनुभवांची, व्यक्तिगत कथा किंवा क्रिएटिव्ह रील्स तयार करून शेअर करायच्या आहेत. या रील्समध्ये डिजिटल इंडियाने त्यांच्या आयुष्यावर कसा सकारात्मक परिणाम केला आहे हे दाखवले जाणार आहे. डिजिटल सेवा, ऑनलाइन शिक्षण, आरोग्य सेवा किंवा आर्थिक साधने अशा विविध बाबतीत टेक्नॉलॉजीने नागरिकांना कशी मदत केली यावर रील केंद्रित असावी.

सरकारने या स्पर्धेत विजेत्यांना आकर्षक पारितोषिके देण्याचा निर्णय घेतला आहे.

  • टॉप १० विजेत्यांना प्रत्येकी १५,००० रुपये

  • त्यानंतरच्या २५ विजेत्यांना प्रत्येकी १०,००० रुपये

  • आणि पुढील ५० विजेत्यांना प्रत्येकी ५,००० रुपये दिले जाणार आहेत.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी काय करावे?

स्पर्धेत भाग घेण्यासाठी काही नियम पाळणे आवश्यक आहे.

  • रील किमान १ मिनिटांची असावी.

  • रील पूर्णपणे मूळ (ऑरिजिनल) असावी, पूर्वी कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर प्रकाशित झालेली नसावी.

  • रील हिंदी, इंग्रजी तसेच कोणत्याही स्थानिक भाषेत बनवता येईल.

  • रील पोर्ट्रेट मोडमध्ये तयार करावी आणि MP4 फॉरमॅटमध्ये असावी.

अधिक माहिती कुठे मिळेल?

स्पर्धेबाबत अधिक माहिती, नियम आणि सहभाग कसा करायचा यासाठी तुम्ही मेरी सरकारच्या अधिकृत वेबसाइटवर भेट देऊ शकता.
https://www.mygov.in/task/decade-digital-india-reel-contest/