Marathi News

GDP: आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा GDP दर 8.2 %: RBI चा ‘तो’ अंदाज चुकला !

Written by:Rohit Shinde
Last Updated:
भारतीय अर्थव्यवस्थेने अपेक्षेपेक्षा खूपच चांगली कामगिरी केली आहे. 28 नोव्हेंबर रोजी सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, भारतीय अर्थव्यवस्थेने सलग तिसऱ्या तिमाहीत प्रभावी गती कायम ठेवली आहे. जुलै-सप्टेंबरमध्ये जीडीपी वाढ 8.2 टक्के या सहा तिमाहीतील उच्चांकावर पोहोचली आहे, जी मागील तिमाहीत 7.8 टक्के होती.
GDP: आर्थिक वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत भारताचा GDP दर 8.2 %: RBI चा ‘तो’ अंदाज चुकला !

आर्थिक वर्ष 2025-26 च्या दुसऱ्या तिमाहीत भारताच्या जीडीपीची वाढ अपेक्षेपेक्षा अधिक गतीनं झाली आहे. जुलै ते सप्टेंबर या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा वेग 8.2 टक्के इतका असल्याची माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. गेल्या वर्षी म्हणजेच 2024-25 या वर्षाच्या दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा वेग 5.6 टक्के इतका होता. तर, एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत जीडीपी चा दर 7.8 टक्के इतका होता. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियान दुसऱ्या तिमाहीत जीडीपी वाढीचा दर टक्के राहील असा अंदाज वर्तवला होता. मात्र तो अंदाजही चुकीचा ठरला आहे. अर्थव्यवस्थेची कामगिरी अपेक्षेपेक्षा चांगली असल्याचे समोर आले आहे.

उत्पादन क्षेत्राचे सर्वाधिक योगदान

राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय (NSO) नुसार, स्थिर किमतींवर वास्तविक GDP या तिमाहीत ₹48.63 लाख कोटींवर पोहोचला, जो गेल्या वर्षीच्या ₹44.94 लाख कोटींपेक्षा जास्त आहे. नाममात्र GDP 8.9% आणि वास्तविक GVA 8.1% ने वाढला. उत्पादन क्षेत्राने सर्वोत्तम कामगिरी केली, 9.1% ने वाढ झाली, तर शेती क्षेत्र 3.5% वर राहिले. उपभोगाच्या बाबतीत, सामान्य जनतेकडून खाजगी वापर (PFCE) 7.9% ने वाढला, जो गेल्या वर्षीच्या 6.4% पेक्षा लक्षणीयरीत्या सुधारला. गुंतवणुकीचा निर्देशक असलेल्या सकल भांडवल निर्मिती (GFCF) ने देखील 7.3% ची मजबूत वाढ नोंदवली.

दुसरीकडे, सरकारी खर्चात नाममात्र आधारावर 2.7% ची घट झाली, ज्यामुळे सरकारने वित्तीय शिस्त राखली असल्याचे दिसून येते. एकंदरीत, मजबूत उत्पादन वाढ, मजबूत देशांतर्गत मागणी आणि सुधारित गुंतवणुकीमुळे, भारतीय अर्थव्यवस्थेने पुन्हा एकदा जगातील सर्वात वेगाने वाढणारी मोठी अर्थव्यवस्था म्हणून आपले स्थान कायम ठेवले आहे. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीत सरासरी वाढ आता 8% च्या आसपास पोहोचली आहे, ज्यामुळे संपूर्ण वर्षासाठी उच्च अंदाज आणखी मजबूत झाले आहेत.

अमेरिकेच्या टॅरीफ धोरणाला धक्का

अमेरिकेनं भारतावर टॅरिफ लावला आहे, भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून आपण भारतावर 50 टक्के टॅरिफ लावल्याचं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं होतं. भारत आणि चीन रशियाकडून तेलाची खरेदी करतात. या पैशांचा वापर रशिया हा युक्रेनविरोधातील युद्धात फंड म्हणून करत आहे, त्यामुळे युक्रेन आणि रशियामध्ये युद्धविराम होत नसल्याचा आरोप देखील डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. दरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांनी लावलेल्या टॅरिफचा मोठा परिणाम हा भारताच्या जीडीपीवर होऊ शकतो असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत होता, मात्र हे सगळे अंदाज साफ चुकल्याचं आता समोर आलं आहे. जीडीपीची आकडेवारी समोर आली असून, भारतानं मोठी झेप घेतल्याचं दिसून येत आहे.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews