नवी दिल्ली: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरु केलेल्या रेसिप्रोकल टॅरिफच्या आक्रमक अंमलबजावणीमुळे भारतीय शेअर बाजारात हाहा:कार उडालेला असताना रिझर्व्ह बँकेकडून एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला. रिझर्व्ह बँकेच्यापतधोरण समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत रेपो रेटमध्ये कपात करण्यात आली होती. आज आता सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. रेपो रेटमध्ये 25 बेसिस पॉईंटची कपात करण्यात आल्याने आता रेपो रेट हा 6 टक्क्यांवर आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी याबाबतची घोषणा केली. फेब्रुवारी महिन्यात महागाई दर 3.61 टक्क्यांवर घसरला होता. तर हाच दर जानेवारी महिन्यात 4.26 टक्के इतका होता. त्यामुळे रेपो रेटमध्ये कपात होईल, अशी अपेक्षा होती. ही अपेक्षा खरी ठरल्याने सामन्य गुंतवणुकदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.

बँकांचे कर्ज स्वस्त? व्याजदरात किती कपात?

बँक ऑफ इंडिया                    पूर्वीचा व्याजदर  9.1%                         नवीन व्याजदर  8.85%

युको बँक                              पूर्वीचा व्याजदर  9.05%                        नवीन व्याजदर  8.80%

इंंडियन बँक                          पूर्वीचा व्याजदर  9.05%                        नवीन व्याजदर  8.70%

पंजाब नॅ. बँक                          पूर्वीचा व्याजदर  9.1%                        नवीन व्याजदर  8.85%

रिझर्व्ह बँकेच्या रेपो रेट कमी करण्याच्या  निर्णयामुळे आगामी काळात आणखी बँकांकडून गृह कर्ज, वाहन कर्ज, वैयक्तिक कर्ज आणि इतर कर्जांच्या व्याजदरात कपात केली जाण्याची दाट शक्यता आहे. रिझर्व्ह बँकेने सलग दुसऱ्यांदा रेपो रेट कमी केल्याने बँकाकडून कर्जांवरील व्याजदरात कपात करण्यासाठीचा दबाव वाढू शकतो. याचा फायदा गृहकर्ज आणि वाहन कर्जाचे हप्ते फेडणाऱ्या सामान्यांना होऊ शकतो. कर्जाचे व्याजदर कमी झाल्याने 25 लाखांच्या कर्जावर वार्षिक 1 लाखांची बचत शक्य होईल.

गृहकर्जदारांना मोठा फायदा: 

खरंतर आरबीआय़ने घेतलेल्या या निर्णयाचा गृहकर्जदारांना मोठा फायदा होणार आहे. गृहकर्ज 25 लाख असेल तर त्यावर 1 लाखांची बचत शक्य आहे. जवळपास सर्वच बँकांनी व्याजदर 0.25 % टक्क्यांनी खाली आणल्याने याचा थेट फायदा जनतेला होतोय. गृहकर्जदारांना होत आहे. आता आगामी काळात यामध्ये आणखी काही सुधारणा होते का ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे. यामुळे गृहकर्ज घेणाऱ्याच्या संख्येत मोठी वाढ होण्याची शक्यता आहे. महागाईने होरपळणाऱ्या भारतीयांना हा नक्कीच मोठा दिलासा असल्याचं मानलं जात आहे.