आज सकाळीच तेलंगणा-आंध्रप्रदेशच्या सीमेवरून एक धक्कादायक अशी बातमी समोर आली. आंध्रप्रदेश-तेलंगणा सीमेवरील कर्नुलच्या नजीक एका खासगी बसला भीषण आग लागल्याची घटना घडली. दुजाकीच्या धडकेमुळे चालत्या बसला भीषण आग लागल्याने 25 जणांचा होरपळून मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाल्याचं समोर आलं आहे. हा मृतांचा आकडा आणखी वाढणार असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या घटनेबद्दल राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांनी दुख: व्यक्त केलं. शिवाय मृतांच्या कुटुंबियांच्या मदतीसाठी देखील तेलंगणा सरकार सरसावले आहे.
अपघाताची घटना कशी घडली ?
हैदराबाद बंगळुरु राष्ट्रीय महामार्गावर कुर्नूल जिल्ह्यातील चिन्नटेकुरु गावाजवळ शुक्रवारी खासगी बसला भीषण आग लागून २५ हून अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेत नेल्लोर जिल्ह्यातील गोल्लावरिपल्ली गावातील एकाच कुटुंबातील चौघा जणांचा मृत्यू झाला. बस हैदराबादहून बंगळुरूकडे जात असताना दुचाकीला धडकल्यानंतर तिला आग लागली. बसला आग लागल्यानंतर प्रवाशांनी भयानक अनुभव कथन केले. हरिका नावाच्या तरुणीने सांगितलं की, “बसचा मागचा दरवाजा तुटलेला होता, त्यामुळे मी तिथून उडी मारली. या प्रयत्नात मला दुखापत झाली,” बसमधील २५ प्रवाशांचा आगीत होरपळून मृत्यू झाला.
हे ही वाचा
तेलंगणा सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, तेलंगणा सरकार मृतांच्या कुटुबियांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले आहे. सरकारकडून मदतीसाठी सर्वोतोपरी हालचाली केल्या जात आहेत. शिवाय जखमींवरील उपचाराचा खर्च देखील सरकार करणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना सहकार्य व्हावे यासाठी तेलंगणा सरकारकडून विशेष हेल्पलाईन देखील जारी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.