पाकिस्तानवर संकटांची मालिका; मुसळधार पावसाने पूरस्थिती, शेकडो लोकांनी जीव गमावला!

Written by:Rohit Shinde
Published:
पाकिस्तानमध्ये अभुतपूर्व पावसामुळे भयावह पुरस्थिती निर्माण झाली आहे, 300 लोकांनी या पुरात जीव गमावला असून शेकडो लोक जखमी असल्याची माहिती समोर येत आहे.
पाकिस्तानवर संकटांची मालिका; मुसळधार पावसाने पूरस्थिती, शेकडो लोकांनी जीव गमावला!

पाकिस्तानमध्ये मुसळधार पावसामुळे भीषण अशी पुरस्थिती सध्या निर्माण झाली आहे. पाकिस्तानात जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापासून सुरू झालेल्या पावसामुळे देशात भीषण हानी झाली असून, आतापर्यंत 300 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये तब्बल 140 लहान मुलांचा समावेश आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिली आहे.या नैसर्गिक आपत्तीत 715 नागरिक जखमी झाले असून, मालमत्तेचेही मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. सुमारे 1,676 घरे बाधित झाली असून त्यापैकी 562 घरे पूर्णपणे कोसळली आहेत. पावसामुळे जनावरांवरही परिणाम झाला असून, 428 पेक्षा अधिक जनावरे मृत्युमुखी पडली आहेत.

अनेकांनी जीव गमावला; कित्येक बेघर!

पावसामुळे उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे अनेक भागात भूस्खलन, विजेचा धक्का आणि इमारती कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली आहे. सरकारी यंत्रणांकडून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असून, आतापर्यंत जवळपास 2,880 नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.नागरिकांना मदत म्हणून 1,999 तंबू, 958 उबदार चादरी, 569 रजया, 1,163 अन्नाचे पाकिटे, 1,122 स्वच्छता किट्स, 1,282 स्वयंपाक साहित्याचे संच, 2,170 प्लास्टिकच्या पत्र्या आणि 146 पाणी उपसण्यासाठी पंप इत्यादी वस्तू वितरित करण्यात आल्या आहेत. दरम्यान, हवामान खात्याने पुढील इशारा दिला आहे की 4 ऑगस्ट ते 7 ऑगस्टदरम्यान देशाच्या उत्तर भागात जोरदार पाऊस, वादळी वारे आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

आपत्तीपासून सुटकेचा पाकचा प्रयत्न

पाकिस्तानमध्ये सध्या मुसळधार पावसामुळे जोरदार पुराचे संकट आणि मृत्यूच्या घटना समोर येत आहेत. कराची, लाहोर आणि पेशावरसारख्या प्रमुख शहरांमध्ये मुसळधार पावसामुळे शहरी भागात पूर, वीजपुरवठा खंडित होणे आणि वाहतुकीस अडथळा निर्माण झाला आहे. नद्या दुथडी भरून वाहत असून, रस्ते खराब झाले आहेत आणि डोंगराळ भागांत भूस्खलनाची परिस्थिती निर्माण झाली आहे. पाकिस्तान हवामान विभागाने अनेक भागांसाठी हवामान इशारे दिले असून नागरिकांनी घरातच राहण्याचे आणि पाण्याने भरलेल्या भागांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.

बचाव पथके, आपत्ती व्यवस्थापन दल आणि स्थानिक प्रशासन पूरग्रस्त भागांमध्ये मदतकार्य करत आहेत, तर हजारो नागरिकांना तात्पुरत्या निवाऱ्यांमध्ये हलवण्यात आले आहे. सरकारकडून मदत कार्य सुरू असले तरी वाढती मृत्यूसंख्या, ढासळलेली पायाभूत सुविधा आणि अपुरी ड्रेनेज व्यवस्था यामुळे प्रभावी आपत्ती व्यवस्थापन, अचूक हवामान भाकीत आणि दीर्घकालीन हवामान सुसूचक योजना यांची तातडीने गरज आहे.