Marathi News

बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी मतदान सुरू; जनतेचा कल कुणाकडे?

Written by:Rohit Shinde
Published:
पहिल्या टप्प्यात आज १२१ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बिहारमधील अनेक मातब्बर नेत्यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलं आहे.
बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यातील 121 जागांसाठी मतदान सुरू; जनतेचा कल कुणाकडे?

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज १२१ जागांसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. बिहारमधील अनेक मातब्बर नेत्यांचं राजकीय भवितव्य पणाला लागलं आहे. यामध्ये महाआघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार तेजस्वी यादव, सम्राट चौधरी आणि विजय कुमार सिन्हा यांच्यासह अनेक मंत्री, भोजपुरी चित्रपटातील सुपरस्टार खेसारी लाल यादव आणि लोकगायक मैथिली ठाकूर यांचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात ज्या आघाडीला जास्त जागा मिळतील, ती आघाडी बिहारमध्ये सरकार स्थापन करण्याची अधिक शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यातील निवडणूक अत्यंत महत्त्वाची असणार आहे.

सुरुवातीच्या आकडेवारीनुसार मतदान संपण्याच्या वेळेपर्यंत म्हणजेच संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी ७० टक्क्यांपर्यंत पोहोचू शकते. बेगुसरायमध्ये सर्वाधिक सकाळी ११ वाजेपर्यंत ३०.३७ टक्के, तर पाटणामध्ये सर्वात कमी २३.७१ टक्के मतदान आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच लोक राज्यभरातील मतदान केंद्रांवर येऊ लागले आणि रांगेत उभे राहिले. त्यांच्यामध्ये महिला मतदारही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

पहिल्या टप्प्यातील १२१ जागांसाठी मतदान

संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सकाळी 7 पासून सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात आज 18 जिल्ह्यांमधील 121 जागांवर मतदान होणार आहे. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या टप्प्यात 3 कोटींहून अधिक मतदार आपला मतदानाचा हक्क बजावतील, ज्यात 1 कोटी 98 लाख पुरुष, 1 कोटी 76 लाख महिला आणि तृतीयपंथी मतदारांचा समावेश आहे. तर दुसरीकडे आज पहिल्या टप्प्यात तेजस्वी यादव, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी, विधानसभा अध्यक्ष विजय सिन्हा आणि बिहार सरकारच्या अनेक मंत्र्यांसह अनेक प्रमुख व्यक्तींचे भवितव्य ठरणार आहे.

बिहारमध्ये कुणाचे सरकार येईल, अंदाज काय?

बिहारमध्ये विविध संस्थांनी केलेल्या सर्व्हेचे आकडे पाहिल्यानंतर काही बाबी प्रकर्षाने जाणवतात. ज्यातून अनेक धक्कादायक आकडेवारी समोर आली होती.

सर्वेक्षणामधील एक महत्त्वाचा प्रश्न असा होता की, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील NDA सरकारबद्दल लोकांचे मत काय आहे? 48% लोकांनी स्पष्टपणे सांगितले की, बिहारमध्ये एक मजबूत सत्ताविरोधी लाट आहे. त्यामुळे यंदा बिहारमध्ये सत्तापालट होतो, की काय अशी चिन्हे दिसत आहेत. आकडेवारीनुसार शहरी आणि ग्रामीण दोन्ही भागांमध्ये सरकारविरोधी भावना सारखीच आहे. जी जवळपास 48% इतकी आहे.

हे सर्वेक्षण राहुल गांधींच्या ‘व्होटर अधिकार यात्रे’नंतर झाले असले तरी या यात्रेचा RJD किंवा काँग्रेसला थेट फायदा होईल असे स्पष्टपणे दिसून येत नाही. मात्र या आकडेवारीवरून हे नक्कीच स्पष्ट होते की बिहारमध्ये सत्ताविरोधी लाट आहे. त्यामध्ये प्रशांत किशोर यांना कशा स्वरूपाचे यश मिळते, यावर बरीच गणितं अवलंबून असणार आहेत.

Rohit Shinde
लेखकाबद्दल
रोहित शिंदे गेल्या 4 वर्षांपासून पत्रकारितेत सक्रिय आहे. टिव्ही तसेच डिजिटल माध्यमांमध्ये कामाचा चांगला अनुभव आहे. अनेक राजकीय तसेच सामाजिक विषयांवर त्याने सातत्याने लेखन केलं आहे. लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी सदैव तत्पर असतो. View all posts by Rohit Shinde
Follow Us :GoogleNews