राज्यातील 29 महापालिका निवडणुकांची घोषणा झाली आहे. यानंतर आता सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. अशातच आज आपण इथं भारतातील सर्वात श्रीमंत महापालिका कोणती आहे आणि तिचं बजेट किती आहे? हे जाणून घेणार आहोत.
देशातील सर्वात मोठी महानगरपालिका ही दुसरी तिसरी कोणतीही नसून मुंबई महानगरपालिका आहे. ज्याचे पूर्ण नाव बृहन्मुंबई महानगरपालिका आहे. मुंबई महापालिका आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. २०२५-२६ या आर्थिक आर्थिक वर्षासाठी मुंबई महापालिकेचं बजेट 74 हजार 427 कोटी रुपयांचे आहे. गेल्यावर्षी मुंबई महापालिकेचे बजेट ६५ हजार १८० कोटी इतके होते. विशेष म्हणजे २०२४-२५ या आर्थिक वर्षात देशातील अनेक राज्यांचे बजेट मुंबई महापालिकेपेक्षा कमी होते.
या राज्यांच्या बजेटपेक्षा मुंबई महापालिकेचं बजेट जास्ट
२०२५ या आर्थिक वर्षासाठी बीएमसीचे बजेट ६५,१८०.७९ कोटी रुपये होते. जर राज्यांबद्दल बोलायचे झाले तर, २०२५ च्या आर्थिक वर्षात हिमाचल प्रदेशचे बजेट ५८,४४३.६१ कोटी रुपये होते. तर मेघालयाचे ५२,९७४ कोटी रुपये, अरुणाचल प्रदेशात ३४,२७० कोटी रुपये, त्रिपुरात २२,९८३ कोटी रुपये, मणिपूरमध्ये २९,२४६ कोटी रुपये, मिझोरममध्ये १३,७८६ कोटी रुपये, नागालँडमध्ये १९,४८५ कोटी रुपये आणि सिक्कीममध्ये १३,५८९ कोटी रुपये होते.
महापालिकांसाठी 15 जानेवारीला मतदान
राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार, मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी पुढील महिन्यात म्हणजेच 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे. तर मतमोजणी 16 जानेवारी 2026 रोजी होणार आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांसाठी 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. जालना आणि इचलकरंजी या दोन नवीन महानगरपालिका आहेत, त्यांचीही निवडणूक होणार आहे.





