Diwali 2025 : दिवाळीत मातीचे किल्ले का बनवतात? जाणून घ्या कारण…

Published:
Last Updated:
दिवाळीत मातीचे किल्ले बनवण्याची परंपरा ही छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा जपणारी, शौर्य आणि सकारात्मकतेचे प्रतीक आहे. ही परंपरा मुलांना इतिहासाची ओळख करून देते.
Diwali 2025 :  दिवाळीत मातीचे किल्ले का बनवतात? जाणून घ्या कारण…

दिवाळीच्या तयारीची सुरुवात झाली आहे. दिवाळी आली की कपडे, फटाके, आकाशकंदील खरेदी करायची लगबग सगळीकडे सुरू होते. एकीकडे घराघरात आई फराळ बनवायला सुरुवात करते आणि लहान मुलांची किल्ला बनवायची तयारी सुरु होते. दरवर्षी लहान मुलांच्या परीक्षा संपल्या की लगेच त्यादिवसापासूनच किल्ला कसा बनवायचा? गेल्या वर्षी बनवलेल्या किल्ल्यापेक्षा या किल्ल्यामध्ये नवीन काय बनवता येईल याचे विचार डोक्यामध्ये सुरु असतात. महाराष्ट्रात किल्ले बनवण्याच्या स्पर्धा देखील आयोजित केल्या जातात. पण हे किल्ले का बनवतात याचे महत्त्व काय आहे जाणून घेऊ या.

किल्ला का बनवतात कारणे 

किल्ले हे अनेक मोठमोठ्या मोहीम व लढायांचे, सुखाच्या आणि दुःखाच्या क्षणाचे, जय-पराजयाचे, शौर्य, पराक्रम, अशा सुवर्ण क्षणांचे साक्षीदार आहेत. तसेच दिवाळीत किल्ला का बनवायचा हा प्रश्न मुलांना खूप पडतो ? याचे कारण असे की जुन्या काळी वाहनांची साधणे नव्हती, म्हणून लोक किल्ले पाहायला जायची. आणि आई-वडील आपल्या मुलांना किल्ल्याची गोष्ट सांगत असत. त्यामध्ये किल्ल्यांचे बांधकाम, त्यावर असणारे बुरुज असे प्रकारे मुलांना किल्ल्यांचा इतिहास सांगत असत. तसेच किल्ला बनवणे ही आपली एक संस्कृती आहे. त्यामुळे लहानमुलांना एका प्रकारची आपली संस्कृती कशा प्रकारे जपली पाहिजे हे समजते. किल्ला बनवण्याचा महत्वाचा उद्देश म्हणजे लहान मुलांना किल्लयांचा इतिहास कळतो. आणि त्यामागील काही कारणे देखील कळतात. किल्लयांमुळे मुलांना एक सकारत्मक विचार करण्याची मदत होते. आणि दिवाळीत सुट्ट्यांचा आनंद घ्यावा आणि शारीरिक मानसिक चालना म्हणून किल्ला बनवण्याची परंपरा झाली आहे.

खेळ आणि विरंगुळा

दिवाळीच्या सुट्टीत मुलांना मैदानी खेळ खेळायला मिळतो, ज्यामुळे ते घरातून बाहेर पडतात. हा खेळ मुलांसाठी एक मनोरंजक आणि सर्जनशील अनुभव देतो.  मुले एकत्र येऊन किल्ला बनवतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये सांघिक कार्य आणि सहकार्याची भावना वाढते.

किल्ला कसा बनवायचा?

गावाकडे प्रामुख्याने दगड, माती, शेण, चिकट धान्याचे पिठ अशा गोष्टी एकत्र करुन एखाद्या किल्ल्याची प्रतिकृती तयार केली जाते. हा किल्ला तयार करताना गल्लीत मुलांवर वेगवेगळ्या कामाची जबाबदारी सोपवली जाते. काही जण हे किल्ला बांधणी करतात. तर काही साहित्य आणण्याचे काम करतात. दुसरे दोघं गावातील शिंप्याकडून ध्वज तयार करुन आणतात. काही जण कुंभाराकडून किल्ल्यावर ठेवायला मुर्ती तयार करुन आणतात. पुढे मग किल्ला बांधणी झाली की, गेरु चुणा वापरुन किल्ल्याची रंगरंगोटी केली जाते. गुंजा, करडई अशा धान्यांनी नक्षीकाम केल्या जातं. मग किल्लावर ध्वज लावले जातात. मुर्ती ठेवल्या जातात. झेंडुच्या झाडाचे तोरण लावले जाते. संध्याकाळी दिवे लावून किल्ल्यावर रोषणाई केली जाते.

(टीप : वरील सर्व बाबी MP मराठी Breaking  केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून MP मराठी Breaking  कोणताही दावा करत नाही.)