हिंदू धर्मशास्त्रानुसार, उद्या म्हणजेच 22 जानेवारी 2026 रोजी देशभरात माघी गणेश जयंती साजरी केली जाणार आहे. गणेशोत्सव हा भाद्रपद महिन्यात साजरा केला जातो. पण मग माघ महिन्यात गणेश जयंती का साजरी केली जाते. या दिवसाची सुरुवात नेमकी कशी झाली ? चला तर मग याबद्दल जाणून घेऊयात…
पौराणिक कथा
पुराणांनुसार, गणपतीने पृथ्वीवरील दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी अनेक अवतार घेतले. त्यापैकी एक म्हणजे माघ शुद्ध चतुर्थीला घेतलेला ‘महोत्कट विनायक’ हा अवतार, म्हणून या दिवसाला ‘गणेश जयंती’ म्हणतात.
पौराणिक कथेनुसार, देवांतक आणि नरांतक या राक्षसांच्या त्रासापासून त्रैलोक्याचे रक्षण करण्यासाठी गणपतीने हा अवतार घेतला. देवांतक आणि नरांतक या राक्षसांनी सगळीकडे हा-हाकार माजवला होता. त्यांचा वध करण्यासाठी कश्यप ऋषींच्या पोटी बाप्पांनी जन्म घेतला. त्याचे नाव महोत्कट विनायक असे ठेवले गेले. महोत्कट विनायक या अवताराने पुढे जाऊन या राक्षसांना संपवलं. हा अवतार माघ महिन्याच्या चतुर्थीला जन्माला त्यामुळे या दिवशी गणेश जयंती साजरी केली जाते.
या दिवशी गणपतीने नरांतक राक्षसाचा वध केला, म्हणून हा दिवस विजय, संरक्षण आणि विघ्ननाशाचे प्रतीक मानला जातो. या दिवशी केलेल्या पूजेने सर्व संकटे दूर होतात अशी श्रद्धा आहे.






