Marathi News

महाराष्ट्रातील गूढ आणि विस्मृतीत गेलेले मंदिर: मूर्तींवर हात फिरवल्यावर निघतात सप्तसूर

Published:
संग्रहालयातील निवडक मूर्तींवर हलकासा स्पर्श केला, किंवा फक्त टीचकी वाजवली तरी त्यातून सप्तसूरांसारखे आवाज प्रतिध्वनीत होतात. दगडातून सूर कसे निघतात? कोणत्या ध्वनिशास्त्रीय तत्त्वांवर हे आधारित आहे? या प्रश्नांची उत्तरं आजही मिळालेली नाहीत
महाराष्ट्रातील गूढ आणि विस्मृतीत गेलेले मंदिर: मूर्तींवर हात फिरवल्यावर निघतात सप्तसूर

महाराष्ट्रात पर्यटन, संस्कृती आणि इतिहासाची अनोखी सांगड घालणारी अनेक स्थळं आहेत. काही ठिकाणं प्रसिद्धीच्या झोतात असतात; तर काही गावं आणि मंदिरे अजूनही लोकांच्या नजरेआड दडून बसलेली आहेत. अशाच दुर्लक्षित पण अत्यंत रहस्यमय ठिकाणांपैकी एक म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील वेलापूर येथील अर्धनारीनटेश्वर मंदिर. हजारो वर्षांचा इतिहास आणि वैज्ञानिक दृष्टीने अजूनही अनुत्तरित असलेली गूढ कोडी—या सगळ्यांमुळे या मंदिराचं महत्त्व अधिकच वाढतं.

*मूर्तींवर हात फिरवल्यावर निघतात सप्तसूर!*

वेलापूरमधील या प्राचीन मंदिराच्या परिसरात पुरातत्व विभागाने एक छोटं संग्रहालय उभारलं आहे. येथे ठेवलेल्या काही मूर्तींबाबत असा अनोखा अनुभव मिळतो की आजही संशोधक त्याचे ठोस कारण सांगू शकलेले नाहीत. संग्रहालयातील निवडक मूर्तींवर हलकासा स्पर्श केला, किंवा फक्त टीचकी वाजवली तरी त्यातून सप्तसूरांसारखे आवाज प्रतिध्वनीत होतात. दगडातून सूर कसे निघतात? कोणत्या ध्वनिशास्त्रीय तत्त्वांवर हे आधारित आहे? या प्रश्नांची उत्तरं आजही मिळालेली नाहीत. स्थानिकांच्या मते, हा अनुभव प्रथमदर्शनी चमत्कारासारखा वाटतो, पण यामागचा नेमका विज्ञान अजूनही गूढतेने वेढलेला आहे.

*ऐतिहासिक मंदिराची रचना आणि वैशिष्ट्यं*

वेलापूर हे केवळ मंदिरामुळेच नाही तर वीरगळांच्या मोठ्या संग्रहामुळेही ओळखलं जातं. या ठिकाणी सुमारे दीडशेहून अधिक वीरगळ पाहायला मिळतात. युद्धात शौर्याने प्राण दिलेल्या वीरांच्या कथा दगडी फलकांवर कोरून ठेवण्याची ही प्राचीन परंपरा येथे मोठ्या प्रमाणावर दिसते.

मंदिराच्या गर्भगृहात पाच हजार वर्षांपूर्वीची शिवपिंड असल्याचे स्थानिक मानतात. आज या ठिकाणी पिंडीच्या स्वरूपात नव्हे, तर दागिन्यांनी अलंकृत अर्धनारीनटेश्वर स्वरूपाची मूर्ती भक्तांच्या दर्शनाला असते. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीची असून कोरीव काम, दगडी खांब आणि समतोल आकार यामुळे मंदिराला विशेष ऐतिहासिक छाप प्राप्त झाली आहे.

*वीरगळांची परंपरा: शौर्याचा दगडी अभिलेख*

‘वीर’ आणि ‘गळ’ या दोन शब्दांपासून बनलेला ‘वीरगळ’ हा शब्द म्हणजे शूरवीराच्या स्मरणार्थ उभारलेला दगड. कर्नाटकातून सुरू झालेली ही परंपरा महाराष्ट्रात राष्ट्रकूट आणि चालुक्य राजवंशांच्या काळात अधिक फोफावली.

वीरगळांवर योद्ध्याचे जीवन, त्याचे युद्धप्रसंग, वीरमरण आणि त्यानंतर त्याला स्वर्गारोहण होताना दाखवलेलं कोरीव चित्रण असतं. वर सूर्य आणि चंद्राची प्रतिमा कोरलेली असते—यातून त्या वीराची कीर्ती सूर्य-चंद्रापर्यंत सदैव टिकून राहील, असा संदेश दिलेला असतो. अनेक गावांमध्ये या वीरगळांना देवस्थानाचे स्वरूप देऊन त्यांची पूजा केली जाते.

*मंदिरावरील शिलालेख: इतिहासाची अमूल्य नोंद*

या परिसरात यादव राजा रामचंद्र (इ.स. 1271–1310) यांच्या काळातील शिलालेख आढळतात. मंदिराच्या भिंतीवरील हे लेखन त्या काळातील धार्मिक महत्त्व, समाजजीवन आणि राजाश्रय यांची माहिती सांगणारे मौल्यवान पुरावे मानले जातात. मंदिरासमोर एक मोठं पाण्याचं कुंड असून ते वर्षभर भरलेलं दिसतं. कुंडाच्या पायर्यांवर आणि गोमुखाजवळही प्राचीन लेखन आढळतं.

*यात्रेची परंपरा आजही कायम*

या गावाची ग्रामदेवता अर्धनारीनटेश्वर असून चैत्र पौर्णिमेला येथे मोठी यात्रा भरते. शुद्ध पंचमीला हळद, अष्टमीला देवाचे पारंपरिक लग्न आणि पौर्णिमेला गावातील भव्य मिरवणूक असा सोहळा अनेक वर्षांपासून सुरू आहे. वद्य अष्टमी हे मुख्य यज्ञ-पूजनाचे दिवशी मानलं जातं.

*का जायलाच हवं वेलापूरला?*

• दगडातून निघणाऱ्या सप्तसूरांचा अनुभव इतरत्र कुठे मिळत नाही
• प्राचीन वीरगळांचा दुर्मिळ आणि समृद्ध संग्रह
• हेमाडपंथी शैलीतील प्राचीन मंदिराची रचना
• 5000 वर्षांचा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा
• यादवकालीन शिलालेख आणि वास्तुकलेची उदाहरणं

महाराष्ट्रात अनेक प्रेक्षणीय ठिकाणं असली तरी वेलापूरचं अर्धनारीनटेश्वर मंदिर हे नक्कीच वेगळ्या श्रेणीतलं. इतिहास, रहस्य आणि आध्यात्मिकतेची त्रिसूत्री जिथे एका जागी अनुभवायला मिळते, ते ठिकाण आपण नक्कीच पाहिलं पाहिजे.

Asavari Khedekar Burumbadkar
लेखकाबद्दल
आसावरी ओंकार बुरुंबाडकर गेली 4 वर्ष पत्रकारितेत काम करत आहे. सध्या MP मराठी Breaking मध्ये डिजिटल कंटेट रायटर म्हणून कार्यरत आहे. आसावरीला मनोरंजन, अध्यात्म, लाईफस्टाईल अशा विविध विषयांमध्ये रुची आहे. यापूर्वी तिने एबीपी माझा, रत्नागिरी टाईम्स या मीडिया हाऊसमध्ये काम केलं आहे. डिजिटल माध्यमात काम करताना वृत्तपत्रांमध्ये विविध विषयावर लिखाण केलं आहे. डिजिटलमध्ये काम करताना ती वाचनाची आणि लिखाणाचीही आवड जपते. View all posts by Asavari Khedekar Burumbadkar
Follow Us :GoogleNews