ओडिशातील पुरी येथील प्रसिद्ध श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. मंदिरात पोलिस कर्मचारी, अधिकारी आणि सेवकांना आता मोबाईल वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. २० सप्टेंबर २०२५ रोजी मंदिराच्या ‘छत्तीस नियोग’च्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. विशेष बाब म्हणजे भाविकांना यापूर्वीच मोबाईल वापरण्यास बंदी आहे.
याबाबत मंदिराचे मुख्य प्रशासक अरविंद कुमार पाधी यांनी सांगितले की, सुरुवातीच्या टप्प्यात, पोलिस आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांना मंदिर परिसरात मोबाईल फोन वापरण्यास मनाई असेल. त्यानंतर हा नियम मंदिरातील सेवकांनाही लागू होईल. परंतु कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी किंवा महत्त्वाच्या संदेशांची देवाणघेवाण करण्यासाठी मोबाईल वापरला तर मात्र कोणतीही हरकत नसेल. मंदिर प्रशासन लवकरच या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी करेल. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या कोणालाही कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशाराही अरविंद कुमार पाधी यांनी दिला.
मोबाईल बंदी कशासाठी ??
पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर प्रशासनाने (Jagannath Puri Temple) मंदिराचे पावित्र्य आणि शिस्त राखण्यासाठी मोबाईल बंदीचा हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे. मोबाईल बंदीमुळे मंदिरात अवांछित वर्तन आणि व्हिडिओग्राफीच्या वाढत्या घटनांना आळा बसेल असे मंदिर प्रशासनाला वाटत आहे. मोबाईल फोनचा जास्त वापर मंदिराच्या शांती आणि आध्यात्मिक प्रतिष्ठेवर परिणाम करतो असे मंदिर प्रशासनाचे मत आहे. तसेच भाविकांना सुरळीत आणि व्यवस्थित दर्शन मिळावे यासाठी कार्तिक महिन्यानंतर ‘रांगेवर आधारित दर्शन व्यवस्था’ लागू करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
जगन्नाथ मंदिर प्रसिद्ध – Jagannath Puri Temple
दरम्यान, ओडिशातील पुरी येथील श्री जगन्नाथ मंदिर हे केवळ प्रमुख हिंदू तीर्थस्थळांपैकी एक नाही तर भारतीय संस्कृती आणि संस्कृतीच्या विविधतेचे एक अद्वितीय प्रतीक आहे. हे मंदिर भगवान जगन्नाथ (भगवान विष्णू/कृष्णाचे एक रूप), त्यांचे भाऊ बलभद्र आणि बहीण सुभद्रा यांना समर्पित आहे. दरवर्षी लाखो भाविक या मंदिराला भेट देतात. विशेषतः जगन्नाथ रथयात्रा हा एक जागतिक उत्सव बनला आहे, जो देश आणि परदेशातून मोठ्या संख्येने भाविकांना आकर्षित करतो.





