भाऊबीज व पाडव्याच्या नंतर दिवाळीचे मुख्य दिवस समाप्त होत असले तरी तुळशीच्या लग्नानंतरच खऱ्या अर्थाने दिवाळीची सांगता होते. तुळशी विवाह म्हणजे तुळशीचे रोप (वृंदा) आणि भगवान विष्णूचे शालिग्राम रूप (कृष्ण/विष्णू) यांचा विवाह लावण्याचा सोहळा. या दिवशी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तुळशी विवाह पार पडतात, तुळशीचे लग्न लागल्यानंतर मनोभावे पूजा करून नैवेद्य अर्पण केला जातो. त्यानंतर सर्वांना प्रसाद दिल जाते. तुळशी विवाहाला बदामाचा शिरा नैवेद्य म्हणून बनवायला अगदी सोपा आहे. चला तर मग जाणून घेऊया बदामाच्या शिऱ्याचा प्रसाद कसा बनवायचा.

साहित्य

  • रवा
  • तूप
  • साखर
  • बदाम
  • वेलची पूड
  • केशरच्या काड्या
  • काजू

कृती

  • सगळ्यात आधी तर बदाम रात्री पाण्यात भिजत घाला. रात्रभर ते चांगले भिजू द्या
  • दुसऱ्या दिवशी सकाळी बदामाची टरफलं काढून टाका आणि ते मिक्सरमधून फिरवून त्याची जाडीभरडी पेस्ट करून घ्या. अगदी बारीक पेस्ट करू नये आणि मिक्सरमधून फिरवताना त्यात पाणीही टाकू नये.
  • एक कढई घ्या आणि त्यात तूप टाका.
  • गरम तूपात रवा चांगला भाजून घ्या.
  • कढईत पुन्हा तूप गरम करुन ही बदामची पेस्ट सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या.
  • त्यात भाजलेला रवा चांगला नीट ढवळून घ्या.
  • त्यानंतर त्यात साखर आणि दूध घालून हे मिश्रण नीट एकजीव करा.
  • त्यानंतर त्यावर झाकण ठेवा आणि शिरा चांगला शिजवून द्या.
  • त्यानंतर केशर घालून थोडा वेळ आणखी शिरा शिजवा.
  • शेवटी त्यावर वेलची पूड आणि बारीक केलेले काजू बदाम टाका.
  • गरमा गरम बदाम शिरा तयार होणार.
  • शिरा सर्व्ह करण्यापूर्वी त्यावर गरमागरम तूप टाकून द्यावे.