2025 वर्षातील अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. डिसेंबरच्या अखेरीस उत्तर भारतासह महाराष्ट्र आणि आजुबाजूच्या राज्यांमध्ये थंडीचा जोर अद्यापही कायम आहे. हवामान विभागाकडून राज्यभरात आज रात्री कडाक्याची थंडी पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. या काळात काही ठिकाणी तापमान 10 अंशांच्या खाली देखील जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरंतर नागरिकांना या काळात आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. हृदयविकाराचा त्रास असणाऱ्या नागरिकांना या काळात विशेष काळजी घ्यावी लागेल.
महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढण्याचा अंदाज
राज्यात पुढील 4 दिवस थंडी कायम राहणार असून पुढील मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात थंडीचा कडाका जाणवण्याची शक्यता आहे. पुढील 24 तासांत महाराष्ट्रातील किमान आणि कमाल तापमानात मोठा बदल अपेक्षित नाही. त्यानंतरच्या 2 ते 3 दिवसांत तापमानात बदल अपेक्षित आहे. ज्यातील हवामानात सध्या चढ-उतार सुरू असून मागील दोन दिवसांपासून किमान तापमानाचा पारा झपाट्याने खाली घसरताना दिसतो आहे. विदर्भातील अनेक शहरांत तापमान थेट दहा अंशांच्या खाली गेले आहे. नागपूर आणि गोंदिया येथे पहाटे 8.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली, तर यवतमाळमध्ये 8.8 अंश आणि गडचिरोलीमध्ये 9.6 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले. या घसरणीमुळे विदर्भात गारठा अधिक जाणवत असून, पुढील काही दिवस ही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे.
मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातही थंडीची तीव्रता वाढताना दिसत आहे. परभणी आणि धुळे येथे किमान तापमान थेट 7 अंशांच्या खाली घसरले आहे. अहिल्यानगर आणि निफाडमध्येही तापमान 8 अंशांच्या खाली नोंदवण्यात आले आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यातील सर्वाधिक नीचांकी किमान तापमान सुमारे 7 ते 8 अंशांच्या दरम्यान राहू शकते. विशेषतः उत्तर महाराष्ट्रात कडाक्याच्या थंडीची स्थिती अधिक जाणवणार आहे. पुढील 24 तासांच्या हवामान अंदाजाकडे पाहिले, तर राज्यातील किमान तापमानात मोठा बदल अपेक्षित नाही. मात्र त्यानंतरच्या 2 ते 3 दिवसांत किमान तापमानात 2 ते 3 अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता असून, पुढे हळूहळू तापमान वाढू शकते. कमाल तापमानाबाबतही पुढील 24 तासांत फारसा बदल होणार नाही. मात्र त्यानंतरच्या काही दिवसांत राज्याच्या उत्तरेकडील भागांत कमाल तापमानात हळूहळू घट होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
हवामान खात्याच्या माहितीनुसार, राज्यभरात थंडीची ही स्थिती पुढील 4 दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. जरी थंडीची लाट अधिकृतपणे जाहीर करण्यात आलेली नसली, तरी किमान तापमानात झालेली घट नागरिकांना स्पष्टपणे जाणवत आहे. सकाळी, पहाटे आणि रात्रीच्या वेळी हवेत गारवा वाढत असून थंड वारे वाहत आहेत. अनेक भागांत धुक्याची चादर पसरलेली दिसत असल्याने दृश्यमानतेवर परिणाम होत आहे.
थंडीत हार्ट अटॅकचा धोका; हृदयाचे आरोग्य जपा !
सध्या सर्वत्र थंडीचा कडाका पाहायला मिळतोय, अशा परिस्थिती हार्ट अटॅकचा धोका वाढत असतो. अभ्यासातून असे दिसून आले आहे की वर्षभरातील उष्ण महिन्यांच्या तुलनेत, सर्वात थंड हिवाळ्याच्या महिन्यांत लोकांना हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता 30% जास्त असू शकते. हिवाळ्यातील थंडीची लाट केवळ गारवा घेऊन येत नाही, तर ती हृदयविकार असलेल्या लोकांसाठी आरोग्याची गंभीर समस्या निर्माण करू शकते. हिवाळ्यात हृदयविकाराचा झटका टाळण्यासाठी काही सोपे उपाय आहेत. थंडीत उबदार कपडे घाला आणि पुरेसे पाणी प्या, कारण पाण्याची कमतरता आणि थंडीमुळे रक्त घट्ट होऊ शकतं. दिवसातून थोडा चाला किंवा हलका व्यायाम करा, जेणेकरून रक्तप्रवाह सुरळीत राहील. जास्त तेलकट अन्न टाळा, फळे आणि भाज्या खा. धूम्रपान व मद्यपान टाळा. रक्तदाब व साखर वेळोवेळी तपासा. या सवयी अंगिकारल्यास हिवाळ्यात हार्ट अटॅकचा धोका कमी होतो.





